माझे वडील मंत्री आहेत यात माझा दोष काय? श्रुती बडोलेचे भावनिक पत्र

0
23
मुंबई/गोंदिया,दि.07-  शिष्यवृत्तीवरुन वाद झाल्यामुळे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची कन्या श्रुती बडोलेने राज्य सरकारकडून मिळणारी शिष्यवृत्ती नाकारली आहे.  वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल आणि यामुळे माझ्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार असेल तर मी ही शिष्यवृत्ती नाकारत आहे  पण मी शिकणार, अवकाश संशोधनात जाणारच असे श्रुती बडोले यांनी लिहिलेल्या भावनिक पत्रात म्हटले आहे.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीलाच शासनाची शिष्यवृत्ती तेही परदेशात शिकण्यासाठी मिळाल्याची बाब समोर आल्यानंतर वाद उभा राहताच त्यांच्या मुलीने ही शिष्यवृत्ती सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिष्यवृत्ती निवडीवरून वाद सुरू होताच श्रुतीने हा निर्णय घेत सोशल मिडियाच्या माध्यमातून एक भावनिक पत्र लिहले आहे.
 श्रुतीने लिहलेले पत्र आम्ही जसेच्या तसे देत आहोत.

मी श्रुती राजकुमार बडोले आय आय टी मद्रास मधून मी शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते. युके च्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स मध्ये मी माझं एम एस्सी पूर्ण केलं. याठिकाणी मी गुणवत्तेनुसार माझा प्रवेश आणि शिक्षण झालं. विद्यापीठाने गुणवत्तेमुळे मला शिष्यवृत्ती दिली ( सरकारी नव्हे). अवकाश संशोधनात काम करायचं हे माझं स्वप्न होत त्यानुसार मी एक एक पायरी चढत गेले तीही गुणवत्तेनुसारच, त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते.

अस्ट्रो फिजिक्स या विषयात जगातल्या पहिल्या सव्वीस व्या विद्यापीठात माझी निवड झाली. ती गुणवत्तेनुसार. या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा हे मी ठरवलंय. मी कर्ज काढुन शिक्षण घेणार नाही हे मी बाबांना आधीच सांगितलं. या पूर्वी भावाच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्जाचे हप्त्ते अजूनही सुरू आहेत.

मला यापूर्वी गुणवत्ते नुसार विदेशातल्या विद्यापीठांनी शिष्यवृत्ती दिलीय. पण पीएचडी साठी शिष्यवृत्ती ची या विद्यपीठात सवलत नाहीय. गुणवत्तेनुसार माझी निवड झाली आहे तर मी याच विद्यापीठात प्रवेश घेणार म्हणून . मी राज्य सरकार कडे शिष्यवृत्ती साठी अर्ज केला. ( *जगातल्या पहिल्या शंभर विद्यापीठ मध्ये प्रवेश मिळत असेल तर त्या विद्यार्थ्याला कुठलाही आर्थिक निकषांची अट नाही हा जीआर आहे* ) तरी मंत्री मुलगी आहे यावर वाद होतील हे आधी वडिलांनी निदर्शनास आणून दिल. त्यामुळे वडिलांनी या निवड प्रक्रियेपासून स्वतःला बाजूला केलं.

पीएचडी इन सायन्स यासाठी राज्य सरकार च्या शिष्यवृत्ती करीत तीन जागा आहेत. या तीन जगासाठी केवळ दोन अर्ज आलेत त्यात एक जागा अजूनही रिक्त आहे. या जागेसाठी अजूनही अर्ज आलेला नाही. तर मी कुणाला डावलून शिष्यवृत्ती मिळवली का? जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठात प्रवेश घेताना आर्थीक निकष लागू नाहीत हा माझ्या शिक्षणापूर्वीच नियम आहे. यात मी पात्र असेल तर यात माझा दोष आहे का? माझं या पूर्वीच शिक्षण गुणवत्तेनुसार झालं आहे. आता वडिलांच्या मंत्री पदा मुळे माझी गुणवत्ता कमी झाली का?

कुणाचाही हक्क कधी डावलला नाही. आणि कधी डावलणार नाही. *वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल. आणि यामुळे माझी गुणवत्ता झाकोळली जाणार असेल तर मी शिष्यवृत्ती नाकारत आहे* पण मी शिकणार अवकाश संशोधनात जाणारच. सावित्रीबाई आणि बाबासाहेबांचं शिक्षणासाठीच स्वप्न साकार करण्यासाठी ….

आपली,
श्रुती राजकुमार बडोले..