महात्मा ज्योतिबा फुले जयंती प्रत्येक जिल्ह्यात होणार उत्साहात साजरी

0
35

गोंदिया, दि.17 :  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य केले. आजच्या आधुनिक विचारांच्या साक्षर समाज निर्मितीमध्ये त्यांचे अमुल्य योगदान आहे. ११ एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती दिन यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्याचा मानस आहे.  प्रत्येक जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून तीन लक्ष रुपये निधी देण्यात येणार आहे.

          त्यासाठी अतुल सावे, मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाज्योती संचालक मंडळाच्या बैठकीत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती सर्व विभाग व सर्व जिल्ह्यांमध्ये अभिनव पध्दतीने साजरी करण्याबाबत ठराव मान्य करण्यात आलेला आहे.

          सदर ठरावात प्रत्येक जिल्हयात शिक्षण विभागाच्या समन्वयाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर चित्रकला स्पर्धा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर रांगोळी स्पर्धा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन व विचारांवर वकृत्व स्पर्धा, मी सावित्रीबाई बोलते किंवा मी ज्योतिबा बोलतोय या विषयांवर एकांकिका स्पर्धा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर निबंध स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करायचे आहे. वरील नमूद सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी रु. 3.00 लक्ष प्रती जिल्हा व रु. 10.00 लक्ष प्रती विभाग असा निधी महाज्योती मार्फत उपलब्ध करुन देण्यात य़ेणार आहे. अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.