विदर्भ राज्यासाठी बीआरएसपीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
8

चंद्रपूर,दि.21 : स्वतंत्र विदर्भाची मागणी ही फार जुनी असून स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही. एवढेच नव्हे तर विदर्भातील शेतकरी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत असून महाराष्ट्र सरकारच्या विदर्भ विरोधी भूमिकेचा परिणाम आहे. जोपर्यंत विदर्भ स्वतंत्र होणार नाही तोपर्यंत विदर्भातील शेतकरी कामगार सुखी होणार नाही त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष अहमद कादर यांनी मोर्चाला संबोधित करताना केले.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्य व अन्य मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर चंद्रपूर जिल्हा बीआरएसपीच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाला बीआरएसपीचे जिल्हा प्रभारी राजू झोडे यांनीही मार्गदर्शन केले.