न्यायालयात फक्त शिक्षाच नाही तर पिडितांना सांत्वन सुध्दा दिल्या जाते-न्या. गिरटकर

0
12

गोंदिया, दि. ३० :- जनतेच्या हिताच्या दृष्टीने प्रचलित कायदयांमध्ये वेळोवेळी परिवर्तन केल्या जाते. कायदयातील होणारे परिवर्तन सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचणे गरजेचे आहे. न्यायालयात फक्त शिक्षाच दिली जात नाही तर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३५७ अंतर्गत पिडित व्यक्ति किंवा बळी पडलेल्या व्यक्तिंच्या नातेवाईकांना सांत्वनेच्या स्वरुपात नुकसान भरपाई दिली जाते. असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.जी. गिरटकर यांनी केले.
पोलिस मुख्यालय कारंजा येथे नुकतेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया ,जिल्हा वकिल संघ आणि पोलिस विभाग गोंदिया यांच्या संयुक्त वतीने आयोजित कायदेविषयक साक्षरता शिबीराचे अध्यक्ष म्हणून न्या. गिरटकर बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर. सहाय्यक सरकारी वकिल ॲड. पी.एस.आगाशे, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. टी.बी.कटरे,उप शिक्षणाधिकारी राजन घरडे यांची उपस्थिती होती.
न्या. गिरटकर पुढे म्हणाले प्रत्येक सुजाण नागरिकांनी कायदयाचे प्राथमिक ज्ञान ठेवणे गरजेचे आहे. दुचाकी,चारचाकी वाहने,वापरणा-या व्यक्तिनी त्यांचा वाहनाचा विमा काढावा अन्यथा त्यांच्या वाहनाने अपघात झाला व त्यात एखादया व्यक्तिचा मृत्यू झाल्यास पिडी व्यक्तिला देण्यात येणारी नुकसान भरपाई ही वाहन मालकाला दयावी लागते. म्हणून कायदेविषयक ज्ञान असणे आवश्यक असल्याचे सांगितले.
विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समित्यांना विविध योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून न्या. गिरटकर पुढे म्हणाले मोफत विधी सेवा व सहाय्य योजनेअंतर्गत न्यायालयात प्रकरण दाखल करण्याकरीता तसेच प्रकरणासंबंधीत सर्व खर्च देणे,प्रकरणात वकिलांची मोफत नेमणूक करणे,प्रत्येक व्यक्तिला विधी सेवा मिळण्याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विधी दक्षता व सहाय्यक केंद्रामार्फत मोफत विधी सेवा पुरविणे,कोणत्याही नागरिकांना कायदेविषयक अडचणी येत असतील तर पॅरा-लिगल व्हॉलेटीयर्स मार्फत त्यांना मदत करणे, लोकअदालत मध्यस्थी योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून न्या. गिरटकर यांनी नागरिक, महिला,दुर्बल घटकातील व्यक्ति, बालक, व पिडितांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सुध्दा केले.डॉ. भुजबळ म्हणाले सर्व शासकिय विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, सुजाण नागरिक, या सर्वानी योग्य समन्वय साधल्यास कोणतीही व्यक्ति न्यायापासून वंचित राहणार नाही असे सांगितले.
कार्यक्रमाला न्या. सागर इंगळे,न्या.खंडारे,न्या.वासंती माहुले, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते. पोलिस निरिक्षक श्री. शुक्ला,श्री. पाटील, पोलिस उपनिरिक्षक श्री. कुथे तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी, पोलिस मित्र पॅरा-लिगल व्हालेंटिअर्स मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणचे आर.जी.बोरिकर ,एम.पी.पटले, शिवदास थोरात,पोलिस कल्याण शाखेचे राज वैद्य, सुनिल मेश्राम,सागर धोडे,पंकज पांडे, राजेश पटले यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. टी.बी.कटरे यांनी केले. संचालन ॲड. शनाना अंसारी यांनी केले. आभार श्री. बरकते यांनी मानले.