पोषाहाराचे महत्व सर्वसामान्यांना कळावे- अधिष्ठाता डॉ.केवलीया

0
14

राष्ट्रीय पोषाहार सप्ताह
गोंदिया,दि.२ : व्यक्तीला जीवनात निरोगी व सुदृढ राहायचे असेल तर पोषाहाराचे महत्व प्रत्येकाला कळले पाहिजे. विशेषत: लहान मूल व गर्भवती महिलेला योग्य पोषाहार वेळेत मिळाला तर त्यांचे आरोग्य निश्चित चांगले राहील. असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया यांनी व्यक्त केले.
१ सप्टेबर रोजी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित राष्ट्रीय पोषाहार सप्ताहाचे उदघाटक म्हणून डॉ.केवलीया बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल परियाल, मेट्रन निरंजन फुलझेले यांची उपस्थिती होती.
डॉ.केवलीया पुढे म्हणाले, कशाप्रकारे आहार घ्यावा याबाबत काही पध्दती आहेत. काही पध्दतीबाबत भ्रम सुध्दा आहेत. आहार तज्ज्ञांनी जनमाणसामध्ये पोषाहाराबाबत असलेला गैरसमज दूर करण्याचे काम करावे.डॉ.पातुरकर म्हणाले, आपण काय खातो, कसे खातो, किती खातो हे आहारात महत्वाचे आहे. मानवी आहारात जीवनसत्व, धातू, खनीजे यांचा समावेश असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने व्यसनापासून दूर राहून सकस आहार घेतला पाहिजे. किती खावे याची सुध्दा मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे यांनी मनोगत व्यक्त केले.
१ ते ७ सप्टेबर दरम्यान चालणाऱ्या पोषाहार सप्ताहनिमीत्त लावण्यात आलेल्या प्रदर्शनाचे मान्यवरांनी पाहणी केली. यावेळी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण त्यांचे नातेवाईक, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यशस्वीतेसाठी विनय पटले, एकता मोगरे, योगेश वलथरे व अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार आहारतज्ज्ञ शिल्पा आंबेकर यांनी मानले.