29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ‘संगमनेर पॅटर्न’ संपूर्ण जिल्ह्यात राबवावा-अॅड. निलेश हेलोंडे 

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ‘संगमनेर पॅटर्न’ संपूर्ण जिल्ह्यात राबवावा-अॅड. निलेश हेलोंडे 

0
37
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची आढावा बैठक
वाशिम, दि. १९ जानेवारी :शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा शासनाचा तसेच कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचा मुख्य उद्देश असून, पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसाय, आधुनिक पिक पद्धती आणि सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. संगमनेर पॅटर्न हा शेती विकासाचा यशस्वी नमुना असून, तो वाशिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचावेल, असे प्रतिपादन कै. वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी केले.
मानोरा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत शेतकऱ्यांसाठी विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मानोरा तहसीलदार उमेश बन्सोड, गटविकास अधिकारी विलास जाधव, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. ओ. रोम, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. कदम, तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अॅड. पाटील म्हणाले की, चिया सारखी कमी खर्चाची व अधिक उत्पन्न देणारी पिके भविष्यातील शेतीसाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे जिल्ह्यात चिया लागवड वाढवून त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना मूल्यवर्धनाचा लाभ मिळून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. मानोरा तालुक्यात किमान एक हजार हेक्टर क्षेत्रावर चिया लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यावर त्यांनी भर दिला.
दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यासाठी चारा लागवड अत्यावश्यक आहे. शेती, चारा आणि दुग्ध व्यवसाय यांचा समन्वय साधल्यास शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळू शकते. यासाठी कृषी विभागाने चारा लागवडीबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
शासनाच्या विविध योजना प्रत्यक्ष गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात की नाही, यावर प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवावे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी दुग्ध व्यवसाय सुरू झाल्यास शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होऊन गावांचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय व शेतीपूरक उद्योगांना चालना द्यावी, असे आवाहन करताना त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मग्रारोहयो) चारा लागवडीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले. दि. ७ जुलै २०२४ च्या शासन निर्णयानुसार मानोरा तालुक्यातील कारखेडा येथे ई-क्लास जमिनीवर चारा लागवड प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी झटका मशिन व तार कुंपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या बैठकीस कारखेडा गावचे सरपंच , नागरिक तसेच पत्रकार उपस्थित होते.

blank