25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली इंजोरी नगरी; 40 दिंड्यांचा उत्स्फूर्त सहभाग

हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली इंजोरी नगरी; 40 दिंड्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
103

वारकरी साहित्य परिषद, गोंदिया यांच्या वतीने भक्तिमय सोहळा

गोंदिया,दि.१३ मार्च -जिल्ह्यातील इंजोरी येथे संत तुकाराम महाराज यांच्या बिजोत्सवानिमित्त वारकरी साहित्य परिषद, गोंदिया यांच्या वतीने भव्य “वारकरी साहित्य परिषद संत मुक्ताई–जनाई–बहिणाबाई महिला हरिपाठ दिंडी उत्सव” अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या उत्सवामध्ये गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून मोठ्या संख्येने वारकरी, महिला मंडळे आणि भक्तगण सहभागी झाले होते. एकूण 40 दिंड्यांनी या उत्सवात सहभाग नोंदवला. प्रत्येक दिंडीमध्ये टाळ, मृदुंग, वीणा, भगव्या पताका आणि हरिनामाचा अखंड गजर यामुळे वातावरण पूर्णतः पवित्र व उत्साही झाले होते.
वारकरी परंपरेनुसार सर्व दिंड्यांनी इंजोरी गावातून भव्य दिंडी काढली. गावातील प्रमुख मार्गांवरून ही दिंडी काढण्यात आली. दिंडीच्या मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करून तसेच पाणी, प्रसाद व स्वागत करून वारकऱ्यांचे मनापासून स्वागत केले. “ज्ञानोबा माऊली तुकाराम”, “राम कृष्ण हरी” अशा हरिनामाच्या गजराने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणात झालेला उत्स्फूर्त सहभाग होय. संत मुक्ताई, संत जनाबाई आणि संत बहिणाबाई यांच्या आदर्शातून प्रेरणा घेत महिलांनी हरिपाठ, अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून आपला भक्तिभाव व्यक्त केला. या दिंडीमध्ये महिलांनी पारंपरिक वेशभूषेत हरिनामाचा गजर करत उत्सव अधिकच रंगतदार केला.
याच अनुषंगाने इंजोरी येथे भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या निमित्ताने “काल्याचा कार्यक्रम” देखील आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भागवत धर्म, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रसार करण्यात आला. कीर्तन, प्रवचन आणि अभंगगायनामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले.blank
या प्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर, वारकरी संप्रदायातील महिला जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष, ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने महिला व युवक उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उत्सव अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरला. या कार्यक्रमामुळे वारकरी परंपरेचे जतन करण्यास तसेच संत साहित्याचा प्रसार करण्यास मोठी चालना मिळाली.
यावेळी सर्व दिंडीतील महिलांना मार्गदर्शन करताना वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी वारकरी परंपरेचे महत्त्व आणि संत साहित्याचा समाजावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक परंपरा नसून तो समाजात समता, बंधुता, नैतिकता आणि सदाचाराचा संदेश देणारी एक व्यापक सामाजिक चळवळ आहे.
भेंडारकर यांनी पुढे सांगितले की संतांच्या विचारांमुळे समाजात प्रेम, शांतता आणि एकात्मतेची भावना वाढीस लागते. संतांनी आपल्या अभंग, कीर्तन आणि प्रवचनातून समाजातील अंधश्रद्धा, भेदभाव आणि अन्याय याविरुद्ध आवाज उठवला आणि सर्वांना समतेचा मार्ग दाखवला. त्यामुळे संत साहित्याचा अभ्यास करणे आणि त्याचा प्रसार करणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे.
तसेच त्यांनी वारकरी साहित्य परिषदेचे उद्दिष्ट स्पष्ट करताना. सांगितले की, संत साहित्याचा प्रचार-प्रसार करणे, वारकरी परंपरेचे जतन करणे आणि नव्या पिढीपर्यंत संतांचे विचार पोहोचवणे हे परिषदेचे प्रमुख ध्येय आहे. महिला दिंडी उत्सवासारख्या उपक्रमांमुळे समाजात भक्तीभाव वाढतो तसेच महिलांना सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय सहभागाची संधी मिळते.
भेंडारकर यांनी सर्व महिलांना संतांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचे आवाहन केले. हरिनाम, हरिपाठ, कीर्तन आणि संत साहित्याच्या माध्यमातून समाजात चांगले संस्कार रुजविण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. तसेच वारकरी परंपरेतील शिस्त, साधेपणा आणि भक्तीभाव जपून संतांचे विचार घराघरात पोहोचविण्याचे काम सर्वांनी एकत्रितपणे करावे, असे आवाहन त्यांनी केले.इंजोरी येथे पार पडलेला हा भव्य महिला हरिपाठ दिंडी उत्सव वारकरी परंपरेचा गौरव वाढवणारा ठरला असून या माध्यमातून संत साहित्याचा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचण्यास मोठी मदत झाली.

blank