25 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ हस्तलिखितांच्या संवर्धनासाठी शासनाचे सकारात्मक पाऊल; नागरिकांनी साथ द्यावी: जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले

हस्तलिखितांच्या संवर्धनासाठी शासनाचे सकारात्मक पाऊल; नागरिकांनी साथ द्यावी: जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले

0
46

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ
गोंदिया, दि.29 : भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आलेले आहे. परंतू हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेत. सदरील हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करुन एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देता यावे या दृष्टीने भारत सरकारने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे, यासाठी हस्तलिखितांच्या संवर्धनासाठी शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांकडे असणारे महत्वपूर्ण दस्तऐवज असल्यास ते शासनाच्या सुपूर्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.
गोंदिया जिल्ह्यात गोंड राज्याचा गौरवशाली इतिहास आहे. त्याचे हस्तलिखित असल्यास शासनाला सुपूर्त करावे अथवा उपलब्ध करुन द्यावे. त्यामुळे भविष्याच्या पिढीला हा इतिहास माहीत होईल. याशिवाय जिल्ह्यातील मठ, मंदिर, काही घराण्यात ऐतिहासिक 75 वर्षापेक्षा जुने हस्तलिखित असल्यास शासनाला उपलब्ध करुन देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् (Gyan Bharatam) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात झाली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह (National Digital Repository) निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यामध्ये हस्तलिखितांची मालकी ही संबंधीत संस्था, ग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांचीच राहणार आहे. परंतू कोणाला स्वखुशीने सदरील हस्तलिखिते शासनाकडे सुपूर्द करावायाची झाल्यास शासन ती स्विकारेल.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पासाठी पुढीलप्रमाणे संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर क्लस्टर केंद्र, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे क्लस्टर केंद्र. आनंद आश्रम संस्थान पुणे स्वतंत्र केंद्र. भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे स्वतंत्र केंद्र.
महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य नोडल अधिकारी म्हणून श्री. सुजितकुमार उगले, संचालक, पुराभिलेख संचालनालय कार्य पाहणार आहेत. तर श्रीमती. अंजली ढमाळ, उपसंचालक, मराठी भाषा विकास संस्था, तथा अभिजात मराठी भाषा कक्षा, मराठी भाषा विभाग या सहनोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
ज्ञान भारतम् हे मोबाईल ॲप
सदर सर्वेक्षणासाठी ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत ज्ञान भारतम् (Gyan Bharatam) हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.