ओबीसी संघटनांची मागणी: जनगणनेवर बहिष्कार
गोंदिया/भंडारा : भंडारा गोंदिया जिल्ह्यात शनिवारपासून अधिकृतपणे गृहगणनेला सुरुवात झाली असली, तरी तुमसर तालुक्यातील खापा येथे या प्रक्रियेला पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला आहे. २०२६-२७ च्या या जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) स्वतंत्र कॉलम नसल्याने संतप्त झालेल्या खापा ग्रामस्थांनी जनगणनेवर थेट बहिष्कार टाकला आहे.गावात दाखल झालेल्या जनगणना कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत नकार देत आल्यापावली परत पाठवले. जोपर्यंत जनगणनेच्या अर्जात ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट केला जात नाही, तोपर्यंत खापा गावात कोणत्याही प्रकारची जनगणना करू दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
सन २०२७ च्या जनगणनेला सुरुवात झाली असून यात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात आला नाही. त्यामुळे देशात ओबीसी समाजबांधवांची संख्या किती हे कळणार कसे, असा सवाल उपस्थित करीत ओबीसी संघटनांना जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना ठेवण्यात यावा, या मागणीसाठी जनगणनेवर बहिष्कार टाकला आहे. यासाठी जिल्हाातील गावागावात जनजागृती केली जात आहे. गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा, डोंगरूटोला, इसाटोला,गिधाडी,घोटी,आमगाव तालुक्यातील पाटीलटोला,आसोली,फुक्कीमेठा,बिरसी, बाम्हणी,गिरोला येथील जनगणनेवर बहिष्कार टाकला.सडक अर्जुनी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात गावकरी एकत्र येत विरोध करु लागले आहेत.
एससी, एसटी व ओपन कॉलम असून ओबीसी कॉलम नसल्याचा रोष ओबीसी (इतर मागासवर्गीय जाती) भारत सरकारने भारताची जनगणना १६ मे पासून सुरुवात केली आहे. सदर जनगणनेत एससी, एसटी, ओपन असे कॉलम आहेत. परंतु, ओबीसीचा स्वतंत्र कॉलम नाही, म्हणून ओबीसींचा कॉलम नसल्याने ओबीसी समाजाच्या जनतेचा सहभाग जनगणनेत राहणार नाही. कारण की, आमच्या मुलां-मुलींना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आरक्षण व कोणतीही सवलत मिळणार नाही. सर्व ओबीसी बांधवांनी या जनगणनेवर बहिष्कार टाकला आहे.





