गोंदिया, दि.५ : बहुजन समाजामध्ये समतेचा वसा स्थापन करणारे महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, यासह नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीकार राजे उमाजी नाईक पुरस्कार जाहीर केलेले आहेत. या पुरस्कारांचे 2025-26 या वर्षातील पात्र प्रस्ताव (व्यक्ती/संस्था) शासनास सादर करण्यास दि.15 जुलै 2026 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तरी जिल्ह्यातील बहुजन समाजातील पात्र नागरिकांनी यासाठी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अटी व शर्ती : अर्जदार व्यक्ती/संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरुपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण, चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे संपर्क साधावा. असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सविता किर्तीकर यांनी कळविले आहे.




