शेवटच्या नागरिकाला कमी वेळात व अल्प खर्चात न्याय मिळावा- न्या. भूषण गवई

0
16

अर्जुनी/मोरगांव येथे दिवाणी न्यायालय इमारतीचे उद्घाटन
गोंदिया,दि.१६ : वकीलांनी पक्षकारांची बाजू मांडतांना ती न्यायिक अधिकाऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडली पाहिजे. न्याय निवाडे ज्यांच्यासाठी लिहिण्यात येतात ते संबंधित पक्षकारांना देखील समजले पाहिजे. शेवटच्या नागरिकाला कमी वेळात व अल्प खर्चात न्याय मिळवून देवूनच सामाजिक आणि आर्थिक समता स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल टाकले जाईल. असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्या. भूषण गवई यांनी केले.
आज अर्जुनी/मोरगांव येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन न्या. गवई यांनी केले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नागपूर खंडपिठाचे न्या. प्रदीप देशमुख, खा. नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर होते. तर मंचावर दिवाणी न्यायाधीश स्वप्नील रामटेके, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पोमेश रामटेके यांची उपस्थिती होती.
न्यायिक अधिकारी, वकील आणि पक्षकारांनी न्यायालयाचा परिसर स्वच्छ ठेवावा असे सांगून न्या .गवई पुढे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने इथल्या न्यायालयाची चांगली इमारत बांधली आहे. इमारतीच्या संरक्षणाकरीता चांगली आवारभिंत देखील बांधण्यात येईल. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२ आणि २२६ नुसार खऱ्या अर्थाने राज्यघटनेला अभिप्रेत असलेला न्याय मिळाला पाहिजे यादृष्टीने आपण कर्तव्ये पार पाडीत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय संसदेने भारतीय वन कायदयात सुधारणा केली तर झुडपी जंगलाचे प्रश्न देखील मार्गी लागतील असे सांगून न्या. गवई म्हणाले, विदर्भातील खासदारांची या प्रश्नांच्या सोडवूणकीसाठी खा. पटोले यांनी एकजूट करावी व हा प्रश्न सोडवावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना ही रक्तविहीन क्रांतीचे शस्त्र असल्याचे म्हटले आहे. देशात आर्थिक व सामाजिक क्रांती आणण्यासाठी राज्यघटना ही शस्त्र असल्याचे त्यांनी सांगितले.
न्या. देशमुख म्हणाले, पूर्वी न्यायालयाचे कामकाज अनेक ठिकाणी तप्त ऊन्हाच्या वातावरणात भाडयाच्या इमारतीत केले जात असायचे आज मात्र चांगल्या व दर्जेदार इमारती न्यायालयाच्या तयार होत आहेत. या इमारतींची देखभाल दुरुस्ती तसेच साफसफाई करण्यासोबतच न्यायालयाचे कामकाज देखील प्रभावी झाले पाहिजे. न्यायालयात प्रकरणे प्रलंबित राहणार नाही याची न्यायिक अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. न्यायालयाने पक्षकारांना तारखांची पूर्वकल्पना दिली तर त्यांची गैरसोय होणार नाही. जिथे न्यायालयाच्या इमारती नाहीत, तेथे इमारती बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
खा. पटोले यावेळी म्हणाले, अर्जुनी/मोरगाव येथे न्यायालयाच्या इमारतीची प्रतीक्षा आजच्या उद्घाटनामुळे संपली आहे. विदर्भातील झुडपी जंगलांच्या प्रश्नामुळे अनेक ठिकाणी जागा असूनसुध्दा इमारती बांधता आल्या नाहीत. न्यायालयाची ईमारत चांगली ठेवण्याचे काम तालुका वकील संघ, न्यायालयीन अधिकारी कर्मचारी व पक्षकारांचे आहे. नागपूर खंडपीठाने जनहिताच्यादृष्टीने निर्णय दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
न्या. अणेकर म्हणाले, पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हे जलदगतीने न्याय देण्यासारखेच आहे. पक्षकारांना या न्यायालयातून जलद न्याय मिळण्यास मदत होईल. गरजू व्यकींना व वकील मंडळीसाठी हे न्यायालय उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी दिवाणी न्यायाधीश स्वप्नील रामटेके, तालुका वकीलसंघाचे अध्यक्ष पोमेश रामटेके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी न्या. भूषण गवई यांच्या हस्ते पाऊणेचार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या दिवाणी न्यायाधीश(कनिष्ठ स्तर) न्यायालयाच्या इमारतीचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली. इमारत बांधकाम करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार व कंत्राटदार पुगलिया यांचे प्रतिनिधी यांचा न्या. गवई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे, अर्जुनी मोरगावच्या नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधक नलीनी भारद्वाज, तालुका वकील संघाच्या वतीने ॲड. रामटेके, ॲड. कापगते, ॲड. पालीवाल, ॲड. बनपुरकर, ॲड. भाजीपाले, ॲड. परशुरामकर यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देवून सत्कार केला. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हयातील न्यायिक अधिकारी, वकील बांधव, न्याषयालयातील कर्मचारी, तालुक्यातील पोलीस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहदिवाणी न्या. साठे यांनी केले व उपस्थितांचे आभार ॲड. अवचटे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली