प्रगतीसाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक- विजयकुमार गौतम

0
15

गोंदिया,दि.९ : आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना राबवितांना यंत्रणांनी त्याचा लाभ जलदगतीने व प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असून त्यामुळे प्रगतीचा मार्ग प्रशस्त होण्यास होईल. असे प्रतिपादन पालक सचिव विजयकुमार गौतम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात विविध विषयांचा आढावा घेतांना श्री.गौतम बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती.
विकासाच्या प्रक्रियेत ग्रामीण रस्ते चांगले असणे आवश्यक असल्याचे सांगून श्री.गौतम म्हणाले, त्यामुळे परिवहन सेवा ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे पोहोचविण्यास मदत होईल. सोबतच ग्रामीण विकासाला चालना मिळेल. गोंदिया जिल्हा निसर्गाने समृध्द आहे. जिल्ह्यात ज्या विविध समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे काम करण्यात येईल. जिल्ह्यात पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे. त्यामुळे पर्यटनातून रोजगार क्षमता वाढण्यास देखील मदत होईल.
जिल्ह्याची कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करावयाची असल्याचे सांगून श्री.गौतम पुढे म्हणाले, आधार नंबरची सांगड बँक खात्याशी घालून मोबाईलशी सुध्दा जोडण्यात यावे. लाभार्थ्यांना यापुढे विविध योजनांचा लाभ देतांना आधार हा महत्वाचा घटक राहणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला कॅशलेस व्यवहारासाठी मशीन देण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन महिन्यात या मशीनचा व्यवहारात उपयोग होतांना दिसणार आहे. आधार ते डिजीटील एकॉनॉमी करणारा राज्यातील पहिला जिल्हा हा गोंदिया राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. १ एप्रिल पासून सर्वप्रकारच्या शिष्यवृत्ती डीबीटी पोर्टलवर जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानाला पॉश मशीन देण्यात येणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले, जिल्ह्यात धडक सिंचन विहिरी कार्यक्रमांतर्गत २००० विहिरी मंजूर झाल्या आहेत. या विहिरींची कामे देखील सुरु झालेली आहेत. या विहिरीतून शेतीच्या बारमाही सिंचनाचे नियोजन कृषि विभागाने करावे. रब्बी हंगामात देखील या शेतीतून जिल्ह्यातील शेतकरी नगदी पिकाची शेती करतील व त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. संपूर्ण जिल्हा मार्च पूर्वी हागणदारीमुक्त होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी पालक सचिव यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांचा, अपूर्णा अवस्थेतील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतला. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
०००००