23.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ बफर क्षेत्रातील तरुणांसाठी़ निसर्ग संवेदना व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर

बफर क्षेत्रातील तरुणांसाठी़ निसर्ग संवेदना व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर

0
35

गोंदिया,दि.८ : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया व बी.एन.एच.एस.नागपूर यांच्या संयुक्त वतीने १७ ते २२ फेब्रुवारी दरम्यान बफर क्षेत्रातील युवकांसाठी निसर्ग संवेदना व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ४६ गावातील ३२१ तरुण सहभागी झाले होते. याव्यतिरिक्त् काही दिवस नवेगाव येथे गावातील ५० तरुणांना वेगळ्याने प्रशिक्षीत करण्यात आले. सहभागी तरुणांना सहायक संचालक संजय करकरे, बी.एन.एच.एस. प्रथम संस्था मुंबई यांचे स्थानिक प्रतिनिधी व वनअधिकारी यांनी मार्गदर्शन केले. सर्व सहभागी तरुणांना प्रमाणपत्र आणि व्याघ्र प्रकल्पाची आठवण म्हणून कॅप व टी शर्ट देण्यात आले. हे शिबीर अरण्यवाचन नवेगावबांध, गडेगाव डेपो, व कृषि विज्ञान केंद्र साकोली येथे आयोजित केले होते.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र हे मध्य भारतातील त्यांचा उत्तर व दक्षिणेकडील ९ व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. त्यामुळे एकूणच व्याघ्र संवर्धनात संवेदनशील व्याघ्र अधिवास असणारे क्षेत्र आहे. या व्याघ्र प्रकल्पाचा बफर क्षेत्रात १८५ गावे असून स्थानिक गरजा भागविण्यासाठी या जंगलावर प्रचंड जैविक दबाव आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या व्यवस्थापनात हा जैविक दबाव कमी करणे व व्याघ्र प्रकल्प क्षेत्राचे महत्व सांगून स्थानिकांना व्याघ्र संवर्धनात सहभागी करुन घेणे हे एक मोठे आव्हान आहे. म्हणूनच बफर क्षेत्रातील गावातील प्रातिनिधीक तरुणांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून लोकांजवळ जावून त्यांना नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे व्यवस्थापन व विकास प्रक्रियेत सहभागी करुन त्यांचा वैयक्तीक विकास साधणे हा उद्देश देखील आहे.
या शिबिरात तरुणांना जंगल व वाघाचे महत्व, व्याघ्र प्रकल्प हा आपल्या गावाच्या विकासास अडथळा नसून संधी आहे, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजना ही गावांच्या सर्वांगीण विकासास कशी लाभदायी आहे याबाबतच्या शासन निर्णयाची माहिती, मानव-वन्यजीव संघर्ष कशामुळे उदभवतो त्यावेळी विरोधापेक्षा स्थानिकांचे सहकार्य कसे महत्वाचे आहे, गावांचा शेती आधारित विकास करता येईल, बफर क्षेत्राबाबतचे गैरसमज, पीक नुकसानीबाबतच्या उपायोजना, हेला फॉरेस्ट १९२६ व ग्रीन आर्मीबाबत माहिती, गावांच्या विकासात व निर्णय प्रक्रियेत तरुणांच्या सहभाग किती महत्वाचा आहे याबाबत मार्गदर्शन केले.
प्रथम संस्था मुंबईच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कौशल्याधारित स्वयंरोजगार विषयांचे आणि विविध स्पर्धा परीक्षांचे तरुणांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात केलेल्या मार्गदर्शनाची माहिती गावातील इतर तरुणांना देवून एकत्रित करण्याबाबत उपस्थित तरुणांना सांगण्यात आले, जेणेकरुन स्वयंरोजगार व स्पर्धा परीक्षाबाबत आणखी मार्गदर्शन व आर्थिक मदत करणे सोईचे होईल. शिबिराच्या शेवटी प्रत्येक तरुणांकडून शिबिरांविषयी हव्या असलेल्या स्वयंरोजगार मदतीसाठी व गावांच्या समस्यासंबंधी अभिप्राय घेण्यात आला.
शिबिरास वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक अमलेंदू पाठक, विभागीय वन अधिकारी उत्तम सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मच्छिद्र मोहुर्ले व कु.सिमा नेवारे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शिबिराचे आयोजन सहायक वनसंरक्षक गीता पवार व नवेगाव राष्ट्रीय उद्यान पार्कचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एन.शिंदे यांनी यशस्वीपणे केले. भविष्यात देखील उर्वरित गावातील युवकांना अशाप्रकारे सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

blank