कारंजा तालुक्यात वीज पडून २ ठार

0
18
वर्धा,दि.11  : कारंजा (घा.) तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत वीज पडून २ ठार तर १0 जण जखमी झाले. यातील दोन महिलांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. मृतकांमध्ये नलिनी संजय उकल्ले (३0) रा. वैशालीनगर, नागपूर व चंदू शिवाजी बमनोटे (२५) रा. गवंडी यांचा समावेश असून दोन्ही घटना बुधवार १0 मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडल्या.
नागपूरच्या वैशालीनगर येथील उकल्ले परिवाराकडील कंदुरीचा कार्यक्रम बुधवारी नारा गावालगतच्या मेंढागड येथे होता. त्या कार्यक्रमाला नलिनी संजय उकल्ले यांचे माहेर असलेल्या बोरी येथीलही सदस्य उपस्थित होते. सायंकाळच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी आल्या. त्यात मेंढागड परिसरात वीज पडल्याने नलिनी उकल्ले रा. वैशालीनगर, नागपूर या जागीच ठार झाल्या. तर चंद्रकला गजानन कालभूत (४५) रा. सेलगाव (लवणे), मंगला विजय हिंगवे (३५) रा.बोरी या दोघींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. इतर जखमींमध्ये मोनाली साहेबराव चौधरी (१७) रा. बोरी, संगीता नरेश खवशी (३0) रा. बोरी, तारा चिंतामण पाठे (४३) रा. वडचिचोली, आशिष चिंतामण पाठे (१९) रा. वडचिचोली आदींचा समावेश आहे.