लाखनी,दि.07-उत्तम वक्ता होण्यासाठी समग्ररक्षित ज्ञान असणं अत्यावश्यक आहे, एका उत्तम वक्त्याला श्रोत्यांप्रती अंतकरनात आपुलकी असावी लागते. असे प्रतिपादन समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ख्यातनाम वक्ते डॉ. संजय पोहरकर यांनी केले. ते स्वप्नपुर्ती फाउंडेशन व समर्थ महाविद्यालय लाखनी द्वारे आयोजित व्यक्तिमत्व विकास व वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळेच्या तृतीय सत्रात वक्ता म्हणून सादर होताना या सत्राचे मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सोबतच सत्राध्यक्ष म्हणून स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे सचिव प्राचार्य सुधीर काळे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. पोहरकर म्हणाले व्यक्तीला ज्ञान नसताना केलेलं वक्तृत्व हे उथळ होत असतं त्यामुळे उत्तम वक्तृत्व केवळ मनोरंजन नव्हे तर ते अभ्यासपूर्ण ज्ञानाचं कलात्मक प्रकटीकरण आहे. वक्त्याच्या वाणीत माधुर्य, विशालता, दिलखुलासपणा, भावसंपन्नता हे गुणवैशिष्ट्ये असली पाहिजेत. असे उत्तम वक्तृत्वाचे अनेक पैलू प्राचार्य डॉ.पोहरकर यांनी उलगडले.
सत्राध्यक्ष प्राचार्य सुधीर काळे म्हणाले की उत्तम वक्तृत्वासाठी अचूक शब्दांची निवड आणि आरोह अवरोह हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत जे वक्तृत्व खुलवतात. या सत्राला अनेक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. त्यापैकी काही प्रशिक्षणार्थीनी सराव सत्रात रक्तदान शिबिराचे उद्घाटन या कार्यक्रमाची तयारी आणि सराव केला. या सत्राचे सूत्रसंचालन सौ. शालु उरकुडे यांनी तर अतिथिंचा परिचय सुभाष गरपडे आणि आभार कार्यशाळा संयोजक अंगेश बेहलपांडे यांनी केले.