पारदर्शकपणे योजनांचा लाभ देवून विकास कामे करा- खा.नाना पटोले

0
9

गोंदिया,दि.१३ : केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. या योजनांचा लाभ गरजू व योग्य लाभार्थ्यांना देतांना आणि विकास कामे करतांना यंत्रणांनी पारदर्शकपणे कामे करावी, असे निर्देश खासदार नाना पटोले यांनी दिले.११ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन खा.पटोले बोलत होते. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा.पटोले बोलतांना पुढे म्हणाले, केंद्राच्या ग्रामीण व शहरी भागासाठी अनेक योजना आहेत. मात्र या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास यंत्रणा उदासीन दिसतात. पावसाळा सुरु होवून सुध्दा आज ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी येत आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व पंचायत विभागाने वेळीच याकडे लक्ष दयावे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. भूजल कायदयाचा वापर करुन भविष्यात पाण्याचा अतिवापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असे सांगून श्री.पटोले म्हणाले, यासाठी कृषि विभागाने गावपातळीवर या योजनेची माहिती शेतकऱ्यांना दयावी. ३१ जुलैपर्यंत जास्तीत जास्त कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी विम्याचा हप्ता भरतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. त्यामुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेतून मदत देता येईल. नैसर्गीक आपत्तीत सापडलेल्या व्यक्तींना वेळीच मदत करावी. गरीब, गरजू व योग्य व्यक्तींना यादृष्टीने लाभ देण्यासाठी प्रशासनाने लक्ष दयावे, असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना ही बेरोजगार व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगून श्री.पटोले म्हणाले, बँकांनी या योजनेअंतर्गत तीन गटातून कर्ज देतांना बेरोजगारांची दिशाभूल करु नये. जिल्हाधिकारी व जिल्हा अग्रणी प्रबंधक यांनी मुद्रा बँक योजनेत व्यक्तीश: लक्ष घालून बँकांना निर्देश दयावे असे सांगितले. जिल्ह्यातील एकही परिवार गॅस कनेक्शन पासून वंचित राहणार नाही यासाठी पुरवठा व वन विभागाने लक्ष दयावे. विविध यंत्रणांनी आपल्या कामात सुधारणा करुन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील वन जमिनीवरील अतिक्रमण नियमीत झाले पाहिजे असे सांगून श्री.पटोले म्हणाले, वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये कराव्यात. ज्या शेतकऱ्यांना धान रोवणी यंत्रे देण्यात आली आहे ती यंत्रे जूनी असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्याचे सांगून त्याची चौकशी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नवनवीन कृषि तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना करण्यासाठी कृषि विभागाने प्रोत्साहित करावे. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होवून पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. गरजू व योग्य व्यक्तीलाच शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. नैसर्गीक आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना वेळीच मदत करण्यात येते. मुद्रा योजनेचा लाभ बेरोजगार व गरजू व्यक्तींनाच दिला पाहिजे यासाठी लक्ष घालण्यात येत असून बेरोजगारांना स्वावलंबी करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेला उपस्थित काही गावातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी समस्या मांडल्या. सभेला गोंदिया पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, सालेकसा पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे, जि.प.सदस्य तेजूकला गहाणे, पं.स.सदस्य अर्चना राऊत, माजी जि.प.सदस्य राजेश चतूर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, सुनिल केलनका यांचेसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व नागरिक उपस्थित होते.