सुरक्षा दौडमुळे मुलांमध्ये विश्वासाचे वातावरण आणि प्रगतीची संधी- आ.गोपालदास अग्रवाल

0
9

सुरक्षा दौडचा समारोप व पारितोषिक वितरण
गोंदिया,दि.२ : नक्षलवाद संपवायचा असेल तर शासनाप्रती विश्वास निर्माण करण्याचे काम सुरक्षा दौडच्या माध्यमातून होत आहे. गोंदिया पोलीस दलाने सुरक्षा दौड हा आगळावेगळा नाविण्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आहे. या दौडमुळे जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना प्रगतीची संधी देखील उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
गोंदिया पोलीस दलाच्या वतीने नक्षलग्रस्त क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांचे खेळांमध्ये करियर घडविण्यासाठी आयोजित सुरक्षा दौड कार्यक्रमाचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी आमदार अग्रवाल मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूरचे संचालक राहूल पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष डी.यु.रहांगडाले यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या इमारती व पोलिसांसाठी शासकीय निवासस्थाने झाली पाहिजे यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांनी पुढाकार घेतल्याचे सांगून श्री.अग्रवाल म्हणाले, आज त्यांच्याचमुळे पोलीस विभागाच्या विकासाला चालना देण्याचे काम होत आहे. पोलिसांशिवाय सर्वांना न्याय मिळू शकत नाही. आनंदाने जगता येत नाही. यासाठी पोलिसांची गरज असल्याचे सांगून श्री.अग्रवाल म्हणाले, लवकरच जिल्ह्यातील पोलिसांसाठी चांगले शासकीय निवासस्थाने बांधण्यात येणार आहे. एकीकडे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी खेळामध्ये प्रगती करीत असले तरी त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. तसेच त्यांना रोजगार देणारे शिक्षणसुध्दा मिळावे यासाठी तंत्रनिकेतन विद्यालय, नर्सिंग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या संस्था आपण मोठ्या प्रयत्नातून मिळविल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.ठाकरे म्हणाले, आदिवासी दुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुलांचे पोलिसांबाबतचे अंतर या दौडमुळे कमी होण्यास मदत झाली आहे. पोलिसांचा संबंध हा गुन्हेगारीला आळा घालणे याबाबत येतो. मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिसांनी सामाजिक बांधीलकी जोपासल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा कायम राहणार आहे. गोंदियासारख्या आदिवासी नक्षलग्रस्त दुर्गम भागात सुध्दा चांगल्या पध्दतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे. भविष्यात आणखी चांगले शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.पाटील म्हणाले, पोलिसांसाठी सोशल पोलिसींग ही अवघड बाब असतांना जिल्ह्यात सोशल पोलिसींगच्या माध्यमातून नक्षलगस्त व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा दौडचे आयोजन करुन पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांनी चांगला पायंडा घातला असून त्यात ते यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून बोलतांना डॉ.भूजबळ म्हणाले, सुरक्षा दौड सहा क्रीडा प्रकारामध्ये आणि चार वयोगटामध्ये घेण्यात आली. जवळपास ७ हजार मुला-मुलींनी यामध्ये सहभाग घेतला. जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याचा उद्देश नक्षलग्रस्त भागातील नागरिकांचा व आदिवासी बांधवांचा विकास झाला पाहिजे हा आहे. याच दृष्टीकोनातून केंद्र आणि राज्य सरकार आणि त्यांच्या यंत्रणा काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील १५ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून देखील आदिवासी नक्षलग्रस्त भागातील मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यात येत असून या केंद्रातून आतापर्यंत १ पोलीस उपनिरीक्षक आणि १२१ पोलीस कॉन्स्टेबल पोलीस दलात भरती झाले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांची जडणघडण चांगली व्हावी, त्यांच्या करियरला दिशा देण्याचे काम या सुरक्षा दौडच्या यशस्वी आयोजनातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते धावण्याच्या सहा क्रीडा प्रकारामध्ये आणि चार वयोगटातील यशस्वी मुला-मुलींना पदक, प्रमाणपत्र व साहित्य देण्यात आले. यावेळी सडक/अर्जुनी वसतिगृहाच्या मुलींनी आदिवासी नृत्य, तिरोडा तालुक्यातील भजेपार येथील विक्तुबाबा दंडार समुहाने दंडार सादर केली. कार्यक्रमाला श्रीमती भूजबळ, श्रीमती ठाकरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) दिपाली खन्ना, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, राजीव नवले यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. समारोप कार्यक्रमाला जिल्ह्यातील सहभागी आश्रमशाळा, शाळा व वसतिगृहाचे विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, अधीक्षक, पालक, पोलीस मित्र, पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार श्री.मेश्राम यांनी मानले.