करवाढीवर दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

0
17

भंडारा,दि.7 : अव्वाचा सव्वा गृहकरवाढीवरून भंडाऱ्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. घरटॅक्स वाढ, अतिक्रमण निर्मूलन या दोन्ही ज्वलंत मुद्यांवर १५ दिवसांच्या आत तोडगा काढावा, अन्यथा यानंतर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवू, असा झणझणीत इशारा गुरूवारी पालिकेचे मुख्याधिकारी यांना आंदोलकांनी दिला.काँग्रेस, शिवसेना, फुटपाथ दुकानदार संघटनेने आज गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पालिका कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी हा अल्टीमेटम देण्यात आला. तसेच मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी नगरसेवक धनराज साठवणे यांनी केले. घोषणाबाजी देत आंदोलकाचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी अनिल अढागळे यांच्या कक्षात चर्चेसाठी गेले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात माजी आ. नरेंद्र भोंडेकर, जिया पटेल, धनराज साठवणे, अ‍ॅड. शिशिर वंजारी, अजय गडकरी, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, डॉ. नितीन तुरस्कर, शम्मु शेख, मिर्झा अख्तर बेग यासह काँग्रेस, शिवसेना व फुटपाथ संघटनेचे सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. चर्चेदरम्यान फुटपाथ दुकानदारांचे अतिक्रमण निर्मूलन काढण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
याशिवाय वाढीव गृहकराच्या बाबतीत कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांना येथे पाचारण करून टॅक्स कसा काय वाढला याचा सर्वांसमक्ष जाब विचारावा, अशी मागणी करण्यात आली. चर्चेदरम्यान वाढीव गृहकर टॅक्स व अतिक्रमण निर्मूलनाबाबत येत्या १५ दिवसात समिती गठित करून निर्णय घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी दिले.गुरूवारी झालेल्या हल्लाबोल आंदोलनात काँगे्रस, शिवसेनेने नागरिकांच्या मुद्यावर पुढाकार घेत आंदोलनात उडी घेतली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते दिसले नाही.