चामोर्शी, दि.१९ः सर्वात मोठा समाज असलेल्या तेली जातीने संघटीत होवून स्वत:च्या हक्कासाठी झटावे, भिकेसाठी नव्हे, असे प्रतिपादन नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम यांनी केले.
जि.प. शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात ‘तेली समाजाची दिशा आणि दशा’ या वैचारिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून तेली समाज महासंघाचे संस्थापक सदस्य विलास काळे, ज्ञानेश्वर रायमल, समन्वयक राजू बोरकर, देवाजी बुरांडे उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना काळे म्हणाले, शासन व्यवस्था हीच समाजाची दरी वाढविण्यास खरी कारणीभूत आहे. टिचभर्यांना ढगभर व ढगभर्यांना टिचभर यामुळे ओबीसी समाजाची लक्तरे वेशीवर टाकण्याचा नियोजित घाट बांधला जात असल्याची खंत काळे यांनी व्यक्त केली.संचालन महेंद्र किरमे यांनी केले. प्रास्ताविक मारोती दुधबावरे यांनी तर आभार रूषीदेव कुनघाडकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी तेली समाज बांधवांनी सहकार्य केले.