उन्हाळी पिकासाठी प्रकल्पाचे पाणी द्या-माजी आमदार दिलीप बन्सोड

0
10

गोंदिया,दि.21: यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही भरपाई उन्हाळी पीक घेवून भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा मानस होता. मात्र प्रशासनाने उन्हाळी पीक न घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता उन्हाळी पिकांसाठी धापेवाडा प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बनसोड यांनी केली आहे.
यंदा कमी पावसामुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खरीपातील पिकांचे पाऊस आणि कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. हाती आलेले पिक पावसाअभावी गमवावे लागल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून उर्वरित पाणी रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी देण्याची मागणी शेतकºयांची आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत कवलेवाडा, धादरी, बेलाटी, मुंडीपार, सालेबर्डी, चिरेखनी, बेलाटी या गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत ३५ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ७ मिटर पाणी बाहेर वाहत आहे. महिनाभरात वाहुन जाणारे १ लाख १० हजार घनमिटर पाणी अडविणे शक्य आहे. त्यासाठी आत्तापासून पाणी साठवून ठेवल्यास पाणी टंचाईच्या समस्येवर मात करणे शक्य असल्याचे बन्सोंड यांनी सांगितले. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. शेतकऱ्यांना पाणी दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न घेण्यास मदत होईल. वीज प्रकल्पाला दिले जाणारे पाणी जानेवारी २०१८ पासूनच देणे बंद केल्यास उन्हाळी पिकांना पाणी देणे शक्य असल्याचे बन्सोड यांनी सांगितले.