पर्यटनस्थळांचा विकास करा-सईद शेख

0
20

भंडारा,दि.27 : भंडारा जिल्हा झाडीपट्टीचे काश्मीर म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील, मुंबई, पुणे, महाबळेश्वर पर्यटन स्थळाप्रमाणे भंडारा जिल्ह्यातही भरपूर वनवैभव, वन्यजीव, जैवविविधता, नैसर्गीक खळखळणारे झरे इत्यादीने समृद्ध संपन्न अशी अनेक सुंदर व रमणीय पर्यटन स्थळे असून सुद्धा पाहिजे तसा पर्यटन विकास झालेला नाही.महाराष्ट्र पर्यटन विकासातर्फे येथील पर्यटन स्थळांचा इको टयुरिझम आराखड्यात समावेश करून तातडीने त्यांच्या विकास करण्यासंदर्भात ग्रीन हेरिटेज संस्थेचे संस्थापक मो. सईद शेख यांनी नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देवून चर्चा केली.
गायमुख येथे नैनितालची आठवण करून देणारे पर्वताच्या मधोमध रमणीय पांगडी जलाशय पर्यंत रोप वे व इतर विकास कामे, चांदपूर, कोका, पवनी येथील बौद्धकालीन स्तुप, गडकिल्ले, मंदिर घाट, गोसेखुर्द बांध, रावणवाडी जलाशय, तुमसर येथील माडगीजवळ वैनगंगेच्या मध्यभागी स्थित मिनी कन्याकुमारी अशी श्री नृसिंह टेकडी, पर्वतीय सौंदर्याने नटलेले कोरंभी, झिरी, हत्तीडोई, गडकुंभली साकोली, तसेच भंडारा येथील प्राचीन गिरी गोसावी यांची मंदिरे व समाध्या, अशी अनेक पर्यटन स्थळे व तिर्थक्षेत्रे जिल्ह्यात असून विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.
रावणवाडी, पवनी गोसेखुर्द, कोका, चांदपूर येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते. आंबागड किल्ला, गायमुख, चांदपूर, कोरंभी, झिरी आदी ठिकाणीही पर्यटक भेट देत असतात. भंडारा जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्राचे स्पेन आहे. पण आवश्यक सोईसुविधा इत्यादींची येथे गरज आहे. गायमुख, चांदपूर, कोका आदी बाबत ईको टयुरीझमचा प्रस्ताव वनविभागाच्या वतीने पुर्व उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी शासनाला पाठविला होता. पण तो प्रस्ताव रखडलेला असल्याची माहिती शेख यांनी रावल यांना दिली.