मामा तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमामुळे शेतकरी समृध्द होण्यास मदत-बडोले

0
8

गोंदिया,दि.१३ :- जिलहयाची ओळख तलावांचा जिल्हा म्हणून आहे. जिल्हयातील तलावात गाळ साचल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमामुळे मोठया प्रमाणात पाणीसाठा निर्माण होईल. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असून शेतकरी समृध्द होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक/अर्जुनी तालुकयातील डव्वा येथील तलाव परिसरात १२ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाअंतर्गत माजी मालगुजारी तलाव पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे, पंचायत समिती सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, पंचायत समिती सदस्य जयशिला जोशी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ. भुमेश्वर पटले, सरपंच पुष्पमाला बडोले, उपसरपंच चेतन वडगाये यांची उपस्थिती होती.
श्री बडोले म्हणाले, तलावाचे खोलीकरण करत असतांना डव्वा हे गाव जलयुक्त शिवार अभियानात घेतले होते. यावर्षी ४५० मामा तलावांचे खोलीकरण करण्यात येणार आहे. उर्वरीत तलांवाचे खोलीकरण पुढील वर्षात करण्यात येईल. या गावाच्या परिसरातील तलावांचे देखील खोलीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विकासाच्या संदर्भात राजकारण बाजूला ठेवून काम करीत असल्याचे सांगून श्री बडोले म्हणाले की, त्यामुळे गावाची विकास कामे मार्गी लागत आहे. या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असतांना अनेक विंधन विहिरी दिल्या. मुख्यमंत्री पेयजल योजनेत डव्वाची निवड केली त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला जाणार आहे. पाणीपुरवठा योजनेच्या कामात गुणवत्ता असली पाहिजे. याची खबरदारी पाणी पुरवठा विभागाने घ्यावी. ही योजना भविष्यात सौर उर्जेवर आणण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती सोनवणे म्हणाल्या, या तलावातील गाळ काढण्यात येणार असल्यामुळे मोठया प्रमाणात पाणीसाठा वाढण्यास मदत होईल. पाणीपुरवठा योजना कार्यन्वित होणार असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सोडविला जाईल. कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले.
श्री परशुरामकर म्हणाले, शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी माजी मालगुजारी तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम हा शासनाचा कौतुकास्पद कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे तलांवातील गाळ काढण्याचे काम सुरु झाले आहे. डव्वासाठी पाणीपुरवठा योजना सुरु झाल्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सरपंच श्रीमती बडोले यांनीही मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते डव्वा येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या कामाचे भूमीपूजन चुलबंद नदीच्या काठावर करण्यात आले. या योजनेच्या कामावर ८६ लाख ४८ हजार १७० रुपये खर्च करण्यात येणार आहे. सन २०३३ ची लोकसंख्या गृहीत धरुन प्रती व्यक्ती ४० लिटर पाणी पुरवठा याप्रमाणे १ लाख ६५ हजार ६८० लिटर पाणी पुरवठा दररोज करण्यात येणार आहे. डव्वा येथील ७९६ कुटूंबातील ३४१८ व्यक्तींसाठी ही योजना कार्यान्वीत होणार आहे.डव्वा येथील माजी मालगुजारी तलावाच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणाऱ्या तलावाच्या खोलीकरणाच्या कामावर ४१ लक्ष रुपये खर्च होणार आहे. यातून ८९ हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असून २० टिएमसी पाणीसाठा वाढणार आहे. १३ हजार क्युबिक मीटर गाळ या तलावातून काढण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री शेगावकर, उपविभागीय अभियंता सुभाष कापगते, शाखा अभियंता श्री वाघमारे, श्री राठोड, यांचेसह गावातील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच चेतन वडगाये यांनी केले. संचालन विलास चव्हाण यांनी तर उपस्थितांचे आभार श्री शहा यांनी मानले.