बाबासाहेबांचे विचार जगताना बुद्धांच्या तत्त्वांशी सुसंगत राहावे: ना. राजकुमार बडोले

0
16

देसाईगंज(वडसा)दि.03ः- जगाला प्रज्ञा, शील आणि करुणेची शिकवण देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे प्रेरणास्त्रोत आहेत. २९ एप्रिल १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभुमीवर असलेल्या वास्तूचे नुतनीकरण, परिसराचे सुशोभीकरण, स्वच्छतागृहाचे बांधकाम आदी कामाचा शुभारंभ करतांना मला अत्यानंद होत आहे. परंतु समाजाने बाबासाहेबांचे विचार जगताना बुद्धांच्याही तत्त्वांशी सुसंगत राहावे, असे विचार सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री ना. राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
स्थानिक दीक्षाभूमी परिसराचे सुशोभीकरण उद््घाटन काल १ नोव्हेंबर रोजी करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम होते.पाहुणे म्हणून आमदार क्रिष्णा गजबे, देसाईगंजच्या नगराध्यक्षा शालुताई दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, न.प. गटनेते किसन नागदेवे, गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती उमाकांत ढेंगे, राजू जेजाणी, सहाय्यक आयुक्त विनोद मोहतूरे, प्रकाश बुक आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. बडोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून शासनानी बहूप्रतिक्षीत असलेल्या या दीक्षाभूमी परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी ५४ लाख २0 हजार रुपये मंजूर झाले. कामाचा शुभारंभ होत आहे. कामाचा दर्जा, सौंदर्यीकरण उत्तमरित्या होईल याची बांधकाम विभागांनी कटाक्षानी लक्ष घालावे. याच दीक्षाभूमीवर ५ कोटी रुपयाची एक विशाल वास्तू उभी राहावी याकरिता प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश दिले. या प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात येईल, असेही आश्‍वासन यावेळी ना. बडोले यांनी दिले. या भूमीचा विकास झाला पाहिजे अशी माझी मनीषा होती आणि आज ती फुलद्रृप झाली. संपूर्ण राज्यात अशा ऐतिहासिक वास्तूच्या / स्थळाच्या विकासासाठी मोठय़ा प्रमाणात निधी वितरीत करण्यात आला आहे. सर्व स्मारके वाचनालय व्हावीत. युवकांच्या ठिकाणी ज्ञानाचा भांडार तयार होऊन आपला देश सर्वांगिण विकसीत व्हावा याकरिता वाचनालयाची अत्यंत आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
पालकमंत्री ना.आत्राम यांनी बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाची घटना आपल्या देशाला दिली. या संविधानामुळेच लोकशाही सुदृढ होऊन देश सुजलाम- सुफलाम होईल. बाबासाहेबाचे विचार सदैव प्रेरणादायी राहणार आहेत. सामाजिक विभागानी या दीक्षाभूमिवर एक विशाल वास्तु तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे म्हणाले. जगातील शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधान अंतभृत केलेला आहे, व त्यावर सातत्याने आकलन केले जाते. अशा महामानवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला यायला मिळाले हे माझे सौभाग्य आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी आमदार क्रिष्णा गजबे, नगराध्यक्षा दंडवते, किसन नागदेवे आदींची समयोचित भाषण झाले.कार्यक्रमाचे संचालन कोसे यांनी केले.