शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात माध्यमांची महत्वाची भूमिका- मंजुषा ठवकर

0
15

भंडारा,दि. 22 :- शासकीय योजनांची माहिती काही त्रुटीमुळे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. पंरतू, पत्रकाराच्या वृत्तांकनामुळे अशा योजनांच्या अंमलबजावणीबाबतचा पाठपुरावा होतो व माहिती जनतेपर्यंत पोहचते. माध्यम लोकहितोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडत असून शासन आणि लाभार्थी यांच्या मधील माहितीचा दुवा प्रसार माध्यम आहेत, असे मत भंडारा जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मंजुषा ठवकर यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत नागपूर येथील पत्र सूचना कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय भंडारा यांच्याथ सहकार्याने, ग्रामीण प्रसारमाध्य्म कार्यशाळा – ‘वार्तालाप’चे उद्‌घाटन शुक्रवारला मंजूषा ठवकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी कार्यशाळेचे विशेष अतिथी माहिती व जनसंपर्क, नागपूर विभागाचे प्रभारी संचालक अनिल गडेकर, पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे सहाय्यक संचालक शशिन राय, भंडा-याचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रसारमाध्यमातील डिजीटल क्रांतीमुळे संदेशवहन जलद झाले असून पत्रकारांनी डिजीटल व सोशल मिडीया याचे तंत्रज्ञान आत्मसात करून आपले संदेश वाचकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचवावेत, असे आवाहन कार्यशाळेचे विशेष अतिथी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क, नागपूर विभागाचे प्रभारी संचालक अनिल गडेकर यांनी यावेळी केले. जगात आज स्मार्ट फोनचा वापर हा 85 टक्के झाला असून मोबाईल असणारा प्रत्येक नागरिक हा एक प्रकारची नागरी पत्रकारिताच करतो आहे. अशा स्थितीमध्ये सोशल मीडियावर संदेश पसरवितांना त्याची विश्वासर्हता, सकारात्मक पैलू पडताळून पत्रकारांनी माहिती द्यावी, असेही गडेकर यांनी सांगितले.
उद्‌घाटन सत्रानंतर पत्रकारांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम तांत्रिक सत्रामध्ये ‘ग्रामीण क्षेत्रात प्रभावी संवादासाठी इलेक्ट्रॉनिक मिडीयाची भूमिका’ या संदर्भात महामेट्रो नागपूरच्या कार्पोरेट कम्युनिकेशन, जनसंपर्क विभागाचे उप व्यवस्थापक अखिलेश हळवे यांनी मार्गदर्शन करतांना ग्रामीण क्षेत्रात मुद्रीत माध्यमाइतकेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे महत्व असल्याचे मत मांडले. यावेळी त्यांनी महामेट्रोच्या प्रकल्पाबाबत तसेच भंडारा ब्रॉड गेज मेट्रो बाबत सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती उपस्थितांना दिली.
विकास पत्रकारितेमध्ये केवळ आकडेवारीवर भर देण्याऐवजी बातमी मूल्याला महत्व देऊन मुख्य समस्येला वाचा फोडणे गरजेचे असते, असे मत विकास संवादामध्ये् ग्रामीण पत्रकारांची भूमिका : स्थाचनिक वृत्त् – राष्ट्री य दृष्टिकोन’ या विषयावर बोलतांना नागपूर येथील केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत फिल्ड आऊटरिच ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी डॉ. मनोज सोनोने यांनी व्यक्त केले.
भंडा-याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी ‘आपत्ती व्यवस्थापनात प्रसार माध्यमांची भूमिका’ यासंदर्भात मार्गदर्शन करतांना आपले प्रशासकीय अनुभव उपस्थितांसमोर सांगितले. आपत्ती व्यवस्थापनात संकटाच्या वेळी त्वरित माहती देण्यासोबतच आपत्ती निवारणा नंतरच्या पुनर्वसनाच्या कार्यांनाही प्रसारमाध्यमांनी उचित प्रसिद्‌धी द्यावी,अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दुस-या तांत्रिक सत्रात भंडा-याचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी ‘ग्रामीण क्षेत्रात प्रभावी जनसंवादासाठी वृत्तपत्र व समाज माध्यमांची भूमिका या विषयावर बोलतांना वृत्तपत्राचा वाचकांशी संपर्क असतो पण सोशल मिडीयाची विश्वासार्हता साशंक असल्याने या मीडीयाचा वाचकाशी थेट सबंध येत नाही, असे याप्रसंगी निदर्शनास आणून दिले. पत्रकारांनी राजकीय मुद्यांचे वृत्तांकन करण्यासोबतच कृषीमधील यशस्वी प्रयोगांच्या बातम्यांनाही महत्व द्यावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
सर्वसामान्य जनतेला समजेल अशा भाषेत पत्रकारांनी आपल्या वाचकाला माहिती द्यावी. अशा बातमीची वाचकाप्रती असणारी आत्मीयता स्थानिक शब्दामुळे वाढते, असे विचार ‘ग्रामीण विकासामध्ये वृत्तांकनाचे महत्व’ यावर बोलतांना भंडारा येथील दै. लोकमतचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे यांनी व्यक्त केले. शेवटच्या तांत्रिक सत्रामध्ये पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे सहाय्यक संचालक शशिन राय यांनी ‘विकास-संवाद आणि पत्र सूचना कार्यालय’ या विषयावर सादरीकरण करतांना कार्यालयाच्या एकूण कार्याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेचे सूत्र संचालन पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे वरिष्ठ लिपीक निळकंठ आमनेरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन भंडा-याचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी केले. यावेळी प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.