जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण करा- चंद्रशेखर बावनकुळे

0
5

नागपूर, दि.12 : पुरेशा निधीअभावी जलसंधारणाच्या जुन्या योजनांची दुरुस्ती बऱ्याच वर्षापासून झालेली नाही. त्यामुळे या योजनांची दुरुस्ती केल्यास नवीन योजनेकरिता लागणाऱ्या खर्चापेक्षा अतिशय कमी खर्चात जुन्या प्रकल्पांना दुरुस्ती करुन पाणीसाठा व सिंचनक्षमता निर्माण करता येते. त्यामुळेजलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
वैनगंगा पाटबंधारे विभाग, अजनी येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सर्वश्री अमादार मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती निशा सावरकर, उकेश चव्हाण, अविनाश ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, अधीक्षक अभियंता ज.द. टाले, कार्यकारी अभियंता आर.आर. बानुबाकोडे, एन.डी. शहारे, तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हा जिल्हा नियोजन अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषद अंतर्गत लघु पाटबंधारे तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण बंधारे इत्यादी प्रकल्पांच्या 52 योजनांच्या दुरुस्तीकरिता 25 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच सर्व योजनांचा सर्वकष आढावा घेऊन दुरुस्तींच्या कामांची गुणवत्ता राखण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
जलसंधारण विभागाने सादर केलेल्या कोल्हापुरी बंधारे, साठवण बंधारे नाला खोलीकरणाच्या एकूण 74 योजनांच्या दुरुस्तीकरिता 18 कोटी रुपये मंजूर केले. तसेच अतिरिक्त 12 कोटी रुपये दुरुस्ती करिता अशा एकूण 30 कोटींच्या योजनांची दुरुस्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच मध्यप्रदेशामध्ये चौराई प्रकल्पामुळे पेच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाणी तुट कमी करण्याकरिता तात्काळ लाभक्षेत्रातील कामाकरिता पाच कोटींची तरतूद मंजूर करुन तात्काळ कामे करण्याचे निर्देश उपस्थित जलसंधारण अधिकाऱ्यांना दिले.
या मंजुरीमुळे नागपूर जिल्ह्यातील पाणीसाठा व सिंचन क्षमतेमध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. सदरचा निधी हा खनिज विकास प्रतिष्ठान निधीअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सर्व नियोजनाकरिता एकूण 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.