पोलीस अधिक्षक बलकवडेंनी घेतले कसनासूर गाव दत्तक

0
14

गडचिरोली ,दि.16ः- जिल्हा हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असून बहुतांश भाग हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. नागरिकांच्या अनभिज्ञतेमुळे शासनामार्फत चालविल्या जाणार्‍या विविध योजनांचा लाभ अद्यापही दुर्गम भागात पोहचत नाही. त्यामुळे आदिवासी नागरिकांना मुलभूत समस्यांपासून वंचित राहावे लागते. याचा विचार करून गडचिरोली पोलिस दलाने अतिदुर्गम भागात शासनाच्या योजना व उपक्रम पोहचविण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनतून ‘ गाव दत्तक योजना’ सुरू केली आहे. या योजनंतग जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावांचा विकास करण्यात येणार आहे.
पोलिसांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या दत्त गाव योजनेंतर्गत जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील ५ गावांची निवड करण्यात आली असून भामरागड तालुक्यातील कसनासूर हे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी दत्तक घेतले आहे. या योजनेंतर्गत गावातील मुलभूत समस्या पाणी, वीज, आराग्य, रस्ते, पुल, शिक्षण, बस सुविधा, रोजगार, कृषी, सिंचन, विविध दाखल आदी समस्यांची माहिती गामभेटी दरम्यान गोळा करून त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच गावातील नागरिकांना गावपातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गावातील गरजू नागरिकांना मधमाशापालन, कुक्कुटपालन यासारखे कुटीरद्योग व लघुउद्योग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गाव दत्तक योजनेत समाविष्ट असलेली गावे भविष्यात जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून ओळखला जावा यासाठी गडचिरोली पोलिस विभागामार्फत पाठपुरावा करण्यात येणार आहे.