जिल्ह्याशी बांधिलकी जोपासून ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करा- जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

0
27

वाशिम, दि.०4 : जागतिक तापमान वाढीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. जिल्ह्याचा फारच कमी भूभाग हा वनव्याप्त आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त जमीन वृक्षाने आच्छादित करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने जिल्हाशी आपली बांधिलकी जोपासून ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले.३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत आयोजित सभेत जिल्हाधिकारी श्री. मोडक बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. मोडक यावेळी म्हणाले की, सर्व विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असल्यामुळे आतापर्यंत किती खड्डे तयार करण्यात आले आहे, याबाबतची अद्ययावत माहिती ऑनलाईन स्वरूपत सादर करावी. ज्या विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, त्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमीन उपलब्ध नसेल तर वन विभागाने पुढाकार घेवून जमीन उपलब्ध करून द्यावी. ई-क्लास जमिनीवर देखील वृक्ष लागवड करावी. ज्या विभागांकडे जमीन उपलब्ध नाही, त्या विभागांची वन विभागाने स्वतंत्र बैठक लावून वृक्ष लागवडीसाठी जमिनीचा प्रश्न सोडवावा. ज्या अंगणवाड्या जास्तीत जास्त वृक्ष लागवड करतील, त्या अंगणवाड्यांना महिला व बाल विकास विभागाने सन्मानित करावे, असे त्यांनी सांगितले.

ज्या विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कमी देण्यात आले आहे, त्यांचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे, असे सांगून श्री. मोडक म्हणाले, सर्व विभागांनी वृक्ष लागवडीसाठी केलेल्या पूर्व तयारीची माहिती अधिकाऱ्यांच्या व्हॉटसअप ग्रुपवर नियमितपणे द्यावी. १५ मे पर्यंत उद्दिष्टानुसार वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.श्री. साळुंखे म्हणाले, आपल्या जिल्ह्याला ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत सुमारे ४३ लक्ष ०३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. हे उद्दिष्ट जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांना विभागून देण्यात आले आहे. संबंधित यंत्रणांनी वृक्ष लागवडीसाठी आवश्यक नियोजन करून १५ मे पूर्वी खड्डे खोदण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले. यंत्रणानिहाय देण्यात आलेल्या उद्दिष्टांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषि विकास अधिकारी पी. एस. शेळके, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी उत्तम फड, जलसंधारणचे श्री. मापारी, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, श्री. चौधरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे व्यवस्थापक अरविंद गंडी, वीज वितरण कंपनीचे श्री. टेंभूर्णे, श्री. टोपले, जिल्हा कारागृहचे श्री. ठाकरे, सैनिक कल्याण विभागाचे एन. डब्ल्यू. वाघमारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे आर. बी. गुढे, कौशल्य विकास विभागाचे डी. ए. वावगे, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे एस. ए. देवगडे, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी बी. डब्ल्यू. दाभाडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे एम. व्ही. देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.