पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षलागवड काळाजी गरज- पालकमंत्री डॉ.फुके

0
11

गोंदिया,दि:8: मागील बऱ्याच वर्षापासून नागरिक आपल्या गरजा पूर्ण करण्याकरीता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करीत आहे. या वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. त्यामुळै ग्लोबल वार्मींग व वातावरणातील बदल अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जलसंकटाची तीव्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर मात करण्याकरीता मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.
७ जुलै रोजी पवार बोर्डींग गोंदिया येथे आयोजित वृक्षलागवड कार्यक्रमात डॉ.फुके अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक तथा वनसंरक्षक श्री.रामानुजम, उपवनसंरक्षक एस.युवराज, वनविकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक दिव्या भारती, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री डॉ.फुके पुढे म्हणाले, दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. कारण मानवाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. यासाठी स्वयंस्फुर्तीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. वृक्षलागवड ही लोकचळवळ होण्याकरीता लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे. वृक्ष लागवड करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे या वृक्षलागवड उपक्रमास सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे म्हणाल्या, येणाऱ्या नविन पिढीसाठी एक चांगला संदेश जावा यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करावे. आपण कोणकोणत्या प्रजातीचे वृक्षारोपण करता यावर सुध्दा पर्यावरणाचे संतुलन अवलंबून असते. आप्तस्वकीयांच्या वाढदिवसाला भेट म्हणून एखादी महागडी वस्तू न देता, वृक्षरोपटे भेट म्हणून दयावे असे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष श्री.इंगळे म्हणाले, ‘३३ कोटी वृक्ष लागवडङ्क हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. गोंदिया नगरपरिषदेद्वारे सुध्दा वृक्ष लागवडीचा चांगला कार्यक्रम राबवून या वृक्ष लागवडीच्या उपक्रमास सहकार्य करण्यात येईल. यासाठी नागरिकांनी पाणी अडवा-पाणी जिरवा व पाणी वाचवा हा उपक्रम राबवावा. या वृक्ष लागवड उपक्रमास सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, नगरसेवक सर्वश्री दिपक बोबडे, बी.बी.अग्रवाल व श्रीमती मैथीली बिसेन, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्यासह वनरक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी केले. संचालन सहायक वनसंरक्षक एम.एच.शेंडे यांनी केले, उपस्थितांचे आभार सहायक वनसंरक्षक श्री.शेख यांनी मानले.