यवतमाळ दि.4 : पंडित दिनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून बाभूळगाव येथील सांस्कृतिक भवनात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते उज्वला गॅस कनेक्शन तसेच विधवा, निराधार महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.यावेळी मंचावर नगराध्यक्ष प्रवीण गौरकर, पं.स.सभापती गौतम लांडगे, जि.प. समाजकल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, सतीश मानलवार, बाजार समितीचे संचालक नितीन परडखे, मनोहर बुरेवार, नगरसेविका पोहेकर, गजू पांडे आदी उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारच्या योजनेची माहिती देताना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले की, आदिवासींच्या विकासाकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळेच आदिवासी बांधव विकासापासून दूर राहिले. 1980 साली समाज कल्याण विभाग वेगळा झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळागाळातील आदिवासींपर्यंत योजना पोहचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालविले आहे. आदिवासींसाठी असलेल्या आर्थिक तरतुदी पैकी 50 टक्के रक्कम यापुढे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ. अशोक उईके यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य लक्षात घेता धूरमुक्तीसाठी बाभूळगाव तालुक्यातील अंत्योदय योजनेअंतर्गत येणाऱ्या कुटुंबाला गॅसचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र सरकारच्यायोजनेतुन विधवा निराधार महिलांना प्रत्येकी 20 हजार रु च्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रशस्ती पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तालुक्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.