- जिल्हास्तरीय समाधान शिबिरात ९५४ तक्रारी
वाशिम, दि. ०४ : पांदन रस्ते, तसेच वाहिवाटीच्या रस्त्यांबाबतची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी तहसीलदार, तालुका भूमिअभिलेख कार्यालय व पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे. अतिक्रमित झालेले पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जमीन मोजणी व अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी आज आयोजित जिल्हास्तरीय समाधान शिबिरामध्ये दिले. तसेच शेतीसाठी रस्ता मागणीसाठी दाखल प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून निर्णय द्यावा व ही प्रकरणे निकाली काढावीत, अशा सूचना केल्या.
सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत पालकमंत्री श्री. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आज वाटणे लॉन येथे जिल्हास्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, धनंजय गोगटे, अनुप खांडे यांच्यासह सर्व तहसीलदार, विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
समाधान शिबिरासाठी वाशिम तालुक्यातून १२६, मालेगाव तालुक्यातून ५३, रिसोड तालुक्यातून ७१, मंगरुळपीर तालुक्यातून १३६, कारंजा तालुक्यातून ४३० व मानोरा तालुक्यातून १३८ अशा एकूण ९५४ तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये पांदण रस्ता अतिक्रमणमुक्त करणे, वाहिवाटीचा रस्ता, सिंचन विहिरी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई, पाणीपुरवठा योजना, वीज जोडणी, घरकुल आदी विषयांच्या तक्रारींचा समावेश होता. न्याय प्रविष्ठ प्रकरणे वगळता उर्वरित तक्रारींवर यावेळी सुनावणी घेण्यात आली. ज्या प्रकरणांमध्ये तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टात सुनावणी घेणे आवश्यक आहे, अशी प्रकरणांची सुनावणी विहित कालमर्यादेत पूर्ण करून प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
मानोरा तालुक्यातील काही गावांमध्ये २०१८ मध्ये वादळी वाऱ्याने घरांचे नुकसान झाले. तेथील नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदारांनी प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. शेंदोना गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर धरणक्षेत्रात गेल्याने ग्रामपंचायतीला नवीन विहीर मिळावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली. याप्रकरणात लघुपाटबंधारे विभागाने तातडीने पाहणी करावी. तसेच पाणीपुरवठा विहीर बुडीत क्षेत्रात असल्यास ग्रामपंचायतीला नवीन विहीर देण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. राठोड यांनी यावेळी केल्या.
ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस उपलब्ध नसल्याची तक्रार शिबिरात दाखल झाली होती. यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, सध्या शेतीमध्ये विविध कामे सुरू आहेत, तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्पदंशासारखे प्रकार अधिक घडतात. त्यामुळे सर्व ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.





