सिरोंचा,दि.22ः- असरअल्ली वनपरिक्षेत्रातील जंगलामध्ये वाघ असल्याचे पुरावे वनविभागाला मिळाले असून असरअल्ली परिसरातील सर्व गावातील नागरिकांनी जंगलात जाताना तसेच गुरे चारताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाचे कर्मचारी गावोगावी जाऊन करीत आहेत.आजपर्यंत असरल्ली जंगल परिसरात मोठय़ा वाघाचे अस्तीव नव्हते. परंतु मागील एक ते दीड महिन्यांपासून वनकर्मचार्यांना वाघाचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे असरअल्ली परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सोमनपल्ली, चिट्टर परिसरातील लोकांनी जंगलात वाघ असल्याचे सांगत आहे. त्यामुळे नागरिकांनी जंगलात सरपणासाठी तसेच जंगलालगतच्या शेतात जाताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाच्या कर्मचार्यांनी केले.





