जनतेचा ‘आधार’ कचर्‍यात,पवनीतील प्रकार

0
5

पवनी दि. १६: येथील गौतम वॉर्डातील बौद्ध विहाराच्या बाजुला हजारो आधारकार्ड बेवारस स्थितीत पडून असल्याचे आढळून आले. याची चौकशी करून डाक विभागाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
केंद्र शासनाने मागील दोन वर्षापासून जनतेला आधार कार्ड काढण्याची सक्ती केली असून शासनाच्या विविध योजनाकरीता आधारकार्डची मागणी केली जात आहे. मग ते बँकेचे खाते उघडताना असो किंवा स्वस्त धान्य दुकानातून धान्य उचलण्याचे काम असो. प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड मागितला जातो. याकरीता शासनाने गावागावांत आधारकार्ड काढण्याची मोहीम राबवून आधारकार्ड काढून घेतले. परंतु, दोन वर्ष लोटूनही अनेकांना आधारकार्ड मिळालेले नाही. परिणामी आधारकार्ड मिळविण्यासाठी लाभार्थ्यांची पायपीट सुरू आहे.
नागरिकांनी काढलेले आधारकार्ड हे बंगलोर, मद्रास येथे बनत असल्याची माहिती असून बनलेले आधारकार्ड पोष्टाद्वारे जनतेच्या पत्त्यावर पाठविले जात आहेत. परंतु, पोष्टातील कर्मचारी आधारकार्ड वाटपात गलथानपणा करीत असून पवनी येथील आधारकार्ड वाटपाची जबाबदारी डाक विभागाने रोजंदारी मजुरांवर सोपविली होती. हे आधार कार्ड त्यानेच कचर्‍याच्या ढिगार्‍यात फेकल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
गौतम वॉर्डातील कचर्‍याच्या ढिगार्‍यात आढळलेले आधारकार्ड हे हजारोच्या संख्येत असून हे कार्ड मागील दोन महिन्यापासून येथे पडून असल्याची परिसरातील नागरिकांमध्ये कुजबूज असून अनेकांनी ओळखीच्या लोकांचे कार्डउचलून नेल्याची माहिती आहे. गौतम वॉर्ड परिसरात आढळून आलेले आधारकार्ड कुणी फेकले? व का फेकले याचा शोध घेणे गरजेचे असून मिळालेले आधार कार्डव्यतिरिक्त किती कार्ड फेकले याचा शोध घेणे गरजेचे आहे. ज्यांनी यापूर्वी आधार कार्ड काढले आहेत. मात्र त्यांचेकडे आधारकार्ड अजूनपर्यंत पोहचले नाहीत अशांना आधारकार्ड मिळवून देण्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे.याप्रकरणात दोषीविरुद्ध कारवाई करण्यात यावी. ज्यांनी आधारकार्ड काढले आहेत परंतु त्यांना कार्ड मिळाले नाहीत त्यांचे आधारकार्ड काढण्याची व्यवस्था विभागाने करावी, अशी मागणी आहे.