गोंदिया,दि.16: कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांमुळेच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास मदत झाली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी लोकसेवेसाठी सक्षमपणे काम करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 15 मे रोजी विविध विषयांवर आढावा सभा घेण्यात आली, त्यावेळी डॉ.बलवकडे बोलत होत्या. सभेला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी व राहूल खांडेभराड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी होत नाही असे दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अंमलबजावणी यंत्रणांनी बाजारपेठेत प्रत्यक्ष पाहणी करुन दुकानात हॅन्ड वॉशची व्यवस्था, फिजिकल डिस्टन्सींगचा वापर, किराणा दुकानात वस्तूंचे भाव फलक, दुकानात आलेल्या व्यक्तींचे नाव नोंदणी रजिस्टर (भ्रमणध्वनीसह) ठेवण्यात येत आहे किंवा नाही याची पुरेपूर खातरजमा करून घ्यावी. कोरोना विषाणूबाबत नागरिकांचे समुपदेश करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मास्क वापरण्याबाबत समजावून सांगावे. जिल्ह्यात मनरेगाची कामे सुरु असून कुठेही बोगस कामे होणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे. अन्नधान्य वाटपात अनियमीतता होणार नाही याची दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले.
डॉ.राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतमध्ये नरेगाची कामे सुरु झाली आहे. सेल्फवरील कामावर दोन आठवड्यात जास्तीत जास्त मजूर कसे उपलब्ध होतील याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जेणेकरुन लोकांची कामाची मागणी वाढेल. जिल्ह्यात १ लाख ७० हजार शेतकरी आहेत. त्यामुळे भातखाचरची कामे तातडीने करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ बलकवडे यांनी मनरेगा, भातखाचर, गोठे, नाली बांधकाम, तलाव खोलीकरण, घरकुल, पीक कर्ज वाटप व कोरोना पार्श्वभूमीवर अलगीकरण व विलगीकरण केंद्र, राज्य सीमेवरील चेकपोष्ट व अन्नधान्य वाटपाबाबत आढावा घेतला.
सभेला सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी व नगरपरिषद/नगरपंचायत मुख्याधिकारी व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.





