ककोडी/देवरी,दि.13(विनोद सुरसावत)ः कोरोना विषाणूच्या संकटकाळात संचारबंदीमुळे शेतकऱ्यांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला होता. खरीप हंगामाच्या तोंडावर दळणवळणाची साधने नसल्यामुळे हंगाम वाया जाणार की काय याची भीती असतांना कृषी विभागाने पुढाकार घेऊन देवरीसारख्या दुर्गम, आदिवासीबहुल आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे,खते, कीटकनाशके व बुरशीनाशके आदि. कृषी निविष्ठा पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले. तालुका कृषी अधिकारी कार्यालय देवरी येथील अधिकारी – कर्मचारी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तसेच क्षेत्रीय अधिकारी- कर्मचारी, शेतकरी गट, कृषी सेवा केंद्रांनी यामध्ये सहभाग घेऊन शासनाची ही मोहीम यशस्वी केली.
देवरी तालुक्यातील ककोडी येथील कृषकोन्नती शेतकरी कंपनीच्या सर्व शेतकरी सदस्य बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला. कंपनीकडे नोंदणी केलेल्या व इतर शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा पोहोचविण्यात आल्या. यासाठी तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, मंडळ कृषी अधिकारी विकास कुंभारे, यांचेसह आत्माच्या व्यवस्थापक स्वप्ना लांडगे, सहव्यवस्थापक सिद्धार्थ राऊत, कृषी सहाय्यक सचिन गावळ,कृषकोन्नती शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष मनेद्र मोहबन्सी,संचालक मनोज मेश्राम, चंदन हिरवाणी, कृषी निविष्ठा खरेदी करणारे शेतकरी, गट प्रमुख व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.





