गोंदिया,दि.30ः पश्चिम बंगाल आणि नेपाळ परिसरात फसलेल्या सोनझरी समुदायातील नागरिकांना सामाजिक कार्यकर्ते निलेश देशभ्रतार व सामाजिक कार्यकर्त्या प्रा.सविता बेदरकर(भुरले)यांच्या पुढाकारामुळे आपल्या गावी पोचता आले आहे.सविताताई आणि निलेश यांनी पुढाकार घेत तिरोडा तालुक्यातील बैरागीटोला,ओझाटोला,डकराम सुकडी येथील 118 व्यक्ती संचारबंदीच्या काळात पश्चिम बंगाल व नेपाळ परिसरात फसल्याची माहिती मिळताच त्यांना गावी आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या.प्रा.सविताताईंनी यांसदर्भातील माहिती कटंगी येथील रहिवासी व फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे सक्रिय पदाधिकारी निलेश देशभ्रतार यांना दिली.त्यांनी लगेच नागरिक समन्वय समितीच्या प्रमुख व समाजसेवी मेधाताई पाटकर,तारा जाधव व युवराज गटकल यांच्याशी संपर्क साधून त्यांना या सोनझरी समाजातील लोकांच्या नावाची यादी सादर केली.त्यानंतर NAPM पश्चिम बंगाल येथील मालदा टाउन,सिलीगुड़ी येथील परसुल आलम,अनन्या विश्वास, संघमित्रा यांच्याशी संपर्क करुन गोंदिया जिल्ह्यातील प्रवासी कामगारांची माहिती दिल्यानंतर त्यांनी त्या सर्व सोनझरी समाजातील लोकांची भोजनाची व्यवस्था करीत त्यांना गोंदियाला पाठविण्यात सहकार्य केले.त्यामुळेच हे लोक आज आपल्या गावी परतले असून निलेश देशभ्रतार,तारा जाधव यांनी रेशन किटसोबतच त्यांना आर्थिक सहकार्य सुध्दा केले आहे.पश्चिम बंगाल येथून आलेल्या या सोनझरी समाजातील लोकांना तिरोडा तालुक्यातील खैरबोडी आयटीआय, तिरोडा व बैरागीटोला येथील सोनझारी देवी मंदिरात क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे.उरलेले लोक सुध्दा येत्या दोनचार दिवसात गोंदिया जिल्ह्यात दाखल होणार असल्याची माहिती नेशनल अलाइंस पीपल मुव्हमेंटचे सदस्य समाजसेवक निलेश देशभ्रतार यांनी दिली आहे.





