35.2 C
Gondiā
Friday, May 17, 2024
Home Blog Page 5998

‘बहुसंख्याकांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज नाही’-केंद्रसरकार

0

वृत्तसंस्था
लखनौ-अल्पसंख्य समाजाच्या धर्तीवर बहुसंख्यांक समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्याची गरज नसल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी (ता.२१) अलाहाबाद हायकोर्टात स्पष्ट केले.उत्तरप्रदेशातील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. नूतन ठाकूर यांनी बहुसंख्य समाजासाठीही मंत्रालय स्थापण्याची मागणी संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर उत्तर देताना केंद्र सरकारने ही भूमिका मांडली. हिंदू समाजाबाबत कोणताही भेदभाव केला जात नाही आणि अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या स्थापनेमुळे हिंदूंबाबत भेदभाव होत नाही. अल्पसंख्य समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटनेतील कलम २९ प्रमाणे अल्पसंख्याक मंत्रालय स्थापन केल्याचेही सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे केंद्रसरकारने बहुसंख्याक(ओबीसी)समाजाला हिंदू समाज उल्लेखीत करुन या समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालया स्थापण्यास हायकोर्टात दिल्याने भविष्यात या समाजाला विविध योजनापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.

अदानींच्या कर्जावरून मोदींवर आरोप

0

वृत्तसंस्था,
नवी दिल्ली-अदानी समुहाचे मालक व उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योगसमुहाला ऑस्ट्रेलियातील कोळसा खाणीसाठी एक अब्ज डॉलरचे कर्ज देण्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निर्णयावरून वादाला तोंड फुटले उठले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हे कर्ज बेकायदा देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला असतानाच, या प्रकरणी फक्त समझोता करार झाला असून, योग्य छाननी व कारवाईनंतरच कर्जाची रक्कम अदा केली जाणार असल्याचे स्टेट बँकेने स्पष्ट केले.
मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच अदानी यांच्या या प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिल्याचे क्वीन्सलँड या ऑस्ट्रेलियन प्रांतांच्या प्रमुखांनी जाहीर केले होते. मोदींच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात स्वतः अदानी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य सहभागी झाल्या होत्या. त्यावरून, ‘स्टेट बँकेने अदानी यांना कर्ज देण्याचा निर्णय नेमक्या कोणत्या औचित्याने घेतला? पंतप्रधानांच्या भेटीवेळी त्यांच्यासमोर नेमके कोण बसले होते, असे प्रश्न काँग्रेस नेते अजय माखन यांनी केला आहे.

संस्कृत सक्तीचे करा

0

नवी दिल्ली-सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमातून जर्मन भाषा वगळण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बळ मिळालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता संस्कृतसाठी दंड थोपटले आहेत. केंद्रीय बोर्डाच्या (सीबीएसई) शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संस्कृत भाषा सक्तीची करा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न ‘संस्कृत भारती’ या संघटनेने केली आहे.जेव्हापासून केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले तेव्हापासूनच शिक्षणात बदल होण्यास सुरवात झाल्याने भविष्यात संघप्रणित इतिहासाचे वचर्स्व राहणार आहे.
‘संस्कृत भाषा ही भारताची ओळख आहे. संस्कृत भाषा येत नसलेला किंवा माहीत नसलेला स्वत:ला भारतीय कसा म्हणवून घेऊ शकतो,’ असा सवाल संस्कृत भारतीचे राष्ट्रीय सरचिटणीस दिनेश कामत यांनी केला आहे. सीबीएसई बोर्डाने शाळा वा कॉलेजांमध्ये तिसऱ्या भाषेचा पर्यायामध्ये परदेशी भाषांना स्थान द्यायचे थांबवायला हवे. अन्यथा आंदोलन केले जाईल,’ असा इशाराही कामत यांनी दिला.
‘स्वातंत्र्यापासूनच्या प्रत्येक सरकारने संस्कृत भाषा संपवण्याचे काम पद्धतशीरपणे केले आहे. खरंतर संस्कृत ही इंडो-युरोपियन भाषांची जननी आहे. पण ही मूळ भाषाच आता मागे पडली आहे. तिच्याऐवजी पर्शियन आणि ऊर्दू भाषेतील शब्द रोजच्या वापरात आले आहेत. त्यांची गरज काय, असा सवाल कामत यांनी केला

संजय राऊत यांना शिवसेनेच्या प्रवक्तेपदावरुन डच्चू

0

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन डच्चू मिळाला आहे. शिवसेनेने शुक्रवारी नव्या पक्ष प्रवक्त्यांची नावे जाहीर केली.

जुन्या प्रवक्त्यांमधील निलम गो-हेंचा अपवाद वगळता पक्ष प्रवक्तेपदी नव्या चेह-यांना संधी मिळाली आहे. मनोहर जोशी, सुभाष देसाई या ज्येष्ठ नेत्यांना डावलून त्यांच्या जागी अमोल कोल्हे, अरविंद सावंत, अरविंद भोसले, विजय शिवतारे आणि डॉ. मनिषा कायंदे यांची पक्ष प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय राऊत यांना प्रवक्तेपदावरुन हटवण्या मागचे नेमके कारण पक्षाने स्पष्ट केले नसले तरी, संजय राऊत यांच्या विधानांनी अनेकदा शिवसेनेच्या अडचणी वाढवल्या आहेत तसेच शिवसेनेची नेमकी भूमिका कुठली असा प्रश्नही निर्माण केला होता. त्यामुळे त्यांना पक्ष प्रवक्तेपदावरुन दूर केल्याची चर्चा आहे.

पक्ष प्रवक्ते हे पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडत असतात तसेच विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांच्या कार्यक्रमांमध्येही पक्षाचा अधिकृत प्रवक्ता सहभागी होऊन पक्षाची बाजू मांडतो.

नागपूरात वेदचे विकास धोरणावर चर्चासत्र

0

नागपूर : विदर्भ आर्थिक विकास परिषदेने (वेद) आयोजित केलेल्या ‘पॉलिटिक्स आॅफ डेव्हलपमेंट’ या विषयावर रविवार, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये चर्चासत्राचे आयोजन केले आहे.ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘द इलेक्शन दॅट चेंज्ड इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी होणार आहे.या चर्चासत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. गडकरी छोट्या राज्याचे पुरस्कर्ते आहेत तर चव्हाण हे मागास भागाच्या विकासावर अधिक भर देण्याची भूमिका मांडणारे आहेत. शिवाय विधानसभा निवडणूक काळात गडकरींनी चव्हाण यांच्यावर नेम साधला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एका व्यासपीठावर येऊन आपली बाजू कशी भक्कमपणे मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चर्चासत्रात राजदीप सरदेसाई हे नियंत्रकाची भूमिका बजावतील. पारंपरिक राजकीय विचारधारा बाजूला सारून विकासाच्या मुद्यांवर राजकीय नेते एकत्र आले पाहिजे, अशी वेदची नेहमीचीच भूमिका आहे. जात, धर्म, क्षेत्र आणि भाषावाद बाजूला सारून मतदारांनी मतदान केले. विदर्भ विकासाच्या दृष्टीने लोकांच्या काय अपेक्षा आहेत, हे नेत्यांनी समजावून घ्यावे, असे वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख आणि सचिव राहुल उपगन्लावार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे

शिवस्मारकाचे चार महिन्यांत भूमिपूजन

0

मुंबई : मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या चार महिन्यांत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केले. या स्मारकासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची आवश्यक परवानगी लवकरच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विशेष म्हणजे या स्मारकासाठी तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने पुढाकार घेतला होता.परंतु केंद्रात त्यांचेच सरकार राहून पर्यावरणाची परवानगी मिळू न शकल्याने त्याचे काम होऊ शकले नव्हते.तसेच बांधकामाच्या काढलेल्या टेंडरलाही प्रतिसाद मिळालेला नव्हता.आता त्यामुळे या आंतरराष्ट्रीय दजार्च शिवाजी स्मारकाच्या भूमिपुजनाचे काम भाजप सरकारच्या काळात होऊन ते पुणर् होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिवसंग्रामचे विनायक मेटे, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले पाहिजे. यासाठी ज्या विभागांच्या मंजुरींची आवश्यकता आहे, त्या तातडीने आणि वेळेची मर्यादा पाळून पूर्ण केल्या पाहिजेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे या स्मारकाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करावा. त्याचबरोबर स्मारकाच्या निर्मितीसाठी सल्लागार निवडण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. जगात अशा प्रकारचे स्मारक ज्या कंपन्यांनी उभारले आहे, त्यांचे देखील मार्गदर्शन यासाठी घेण्यात यावे, या सर्व तांत्रिक बाबी येत्या तीन ते चार महिन्यात पूर्ण करून पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जे. जे. स्कूल आॅफ आर्टने स्मारकाचे संकल्पचित्र तयार केले आहे. त्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. हे स्मारक अरबी समुद्रातील भव्य अशा खडकावर उभारणार असून ते राजभवनापासून दीड किलोमीटर अंतरावर, तर मरीन ड्राईव्हपासून साडेतीन किलोमीटर आणि गेट वे आॅफ इंडियापासून साधारणत: १० ते १२ किलोमीटरवर असेल.

खासदारांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक विचार करणार-फडणवीस

0

मुंबई – केंद्राकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या प्रश्नांवर “सह्याद्री‘ अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन त्यात अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांचा गांभीर्यपूर्वक पाठपुरावा करण्याचे ठरले.यावेऴी आम्ही शासनाच्या विविध विभागांना मागणी, सूचनांची पत्रे देतो पण त्यांचे उत्तर देण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही, अशी तक्रार राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर, खासदारांच्या पत्रावर काय कार्यवाही शासनाने केली हे त्यांना दोन महिन्यांच्या आत कळविले जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
या बैठकीस लोकसभा आणि राज्यसभेतील राज्याचे खासदार उपस्थित होते. बैठकीस केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्याचप्रमाणे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार शरद पवार यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या खासदारांची उपस्थिती होती. या खासदारांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली. ब्रिमस्टोवॅड, अपारंपरिक ऊर्जा, मुंबई उपनगर रेल्वेशी संबंधित प्रश्न, मुंबई विकास योजनेत केंद्राचा निधी मिळणे, परवडणारी घरे, मराठवाड्यातील दुष्काळ, कोल्हापूरला कोकण रेल्वेने जोडणे, अतिरिक्त दुधाचा प्रश्न, कापूस हमी भाव, मेट्रोचे जाळे, आरोग्य यंत्रणा, इंदू मिल जमिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रस्तावित स्मारक अशी विविध विषयांवर चर्चा होऊन केंद्राकडे याचा पाठपुरावा सातत्याने करण्याचे ठरले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देणे, कोस्टल रोड अशा प्रश्नांवरही चर्चा झाली.
खासदारांच्या विभागनिहाय बैठका
राज्यातील खासदारांच्या मागण्या तसेच प्रलंबित प्रश्न लक्षात घेता खासदारांच्या विभागनिहाय बैठका घ्याव्यात, अशी काही खासदारांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. त्याचप्रमाणे खासदारांच्या आणि सर्वच लोकप्रतिनिधींच्या पत्रांना तातडीने उत्तरे गेली पाहिजेत, असे निर्देश देण्यात येतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देवरीतून स्वच्छता मोहिमेला शुभारंभ

0
मार्गदर्शन करताना जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर

देवरी : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद गोंदिया तथा पंचायत समिती देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने देवरीच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी (दि.२०) स्वच्छता मेळाव्याची सुरवात करण्यात आली. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अधिकारीवर्ग उपस्थित होता. सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेत हातात झाडू घेऊन रस्ते स्वच्छ केले.

स्वच्छता मेळावा व स्वच्छ ग्राम योजनेचा शुभारंभ देवरीतून करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यपालन अधिकारी ज्ञानेश शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर हे होते. विशेष अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मदन पटले,सभापती सविता पुराम, मोरेश्वर कटरे, प्रकाश गहाणे, कुशन घासले, देवरीचे सरपंच संतोष मडावी, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, जि.प.सदस्यगण राजेश चांदेवार, जागेश्वर धनबाते, सीता राहांगडाले, योगेंद्र भगत, भूपेंद्र नाचगाये, उषा हर्षे, मीलन राऊत, प्रेमलता दमाहे, पारबताबाई चांदेवार, अतिरिक्त कार्यपालन अधिकारी निरंतर पाडवी, जिल्हा कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, सभापती कामेश्वर निकोडे, गटविकास अधिकारी एस एन मेश्राम, पं.स.सदस्य माणिक भंडारी, उत्तम मरकाम, उषा शहारे, कल्याणी कटरे उपस्थित होते.
स्वच्छतेवर सर्व जि.प.सदस्यांनी आपले विचार मांडले. यावेळी तालुक्यातील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, कृषी आरोग्य व वनविभाग, ल.पा., ग्रामपंचायत, बी.आर.सी., पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक राजेश उफाळकर यांनी, संचालन दिशा मेश्राम तर आभार खंडविकास अधिकारी मेश्राम यांनी मानले. या कार्यक्रमानंतर जि.प.च्या सर्व सदस्यांनी व मुख्य कार्यपालन अधिकारी शिंदे यांनी शहरातील मुख्य चौकातील ठिकाणी हातात झाडू घेवून रस्त्यांची सफाई केली.

केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा

0

खासदार नाना यांचे निर्देश

गोंदियाः जिल्ह्यातील नागरिकांना विविध मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासह वैयक्तिक लाभांच्या योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खा.नाना पटोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारला जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन खा.पटोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डी डी शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा.पटोले म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसील कार्यालय येथे आयोजित लोकशाही दिनाला तालुका पातळीवरील सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी योग्य समन्वयातून पुढाकार घ्यावा. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची कामे करताना उत्कृष्ट दर्जाची कामे होतील याकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी ग्राहकांसाठी बसण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असेही खा.पटोले यांनी सांगितले. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून ग्रामीण भागात इंटरनेट सेवा आणि मोबाईल सेवेसाठी चांगले कव्हरेज मिळाले पाहिजे याकडे लक्ष द्यावे, असेही खा.पटोले म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सैनी म्हणाले, जिल्ह्यात १७ मोबाईल टॉवर उभारण्यासाठी बीएसएनएलला वन विभागाकडून जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल. मोबाईल टॉवर उभारणीमुळे बीएसएनएलच्या इंटरनेट व मोबाईल सेवेचे कव्हरेज चांगले मिळण्यास मदत होईल.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत जिल्ह्यात १ ते ९ टप्प्यात २४१ रस्त्यांचे ८२७ कि.मी.ची कामे झाली आहेत. सन २०१३-१४ मध्ये १३ पुलांचे कामे प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ६१३ कामे सुरू आहे. या कामांवर ४६२३ मजूर काम करीत आहे. जिल्ह्यात स्वतंत्र ३८८ ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यरत असून त्यापैकी केवळ ६ योजना नादुरुस्त आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ५५६ ग्रामपंचायतीपैकी ३२७ ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळाले आहे. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत ७३१ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत ७३१ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील ७४ हजार ७८९ घरगुती लाभार्थ्यांना विद्युतीकरण योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

एलबीटीच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारचे घुमजाव?

0

पीटीआय
मुंबई-राज्यात वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) लागू झाल्याशिवाय स्थानिक संस्था करप्रणाली (एलबीटी) रद्द न करण्याच्या पावित्र्यात राज्य सरकार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. त्यामुळे निवडणूक काळात एलबीटी रद्द करण्याच्या आश्वासनावर फडणवीस सरकारने घुमजाव केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्याची पूर्ण जाणीव देखील आम्हाला आहे. परंतु, त्याचवेळी राज्याची आर्थिक व्यवस्था सध्या बिकट असल्याचेही सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. एलबीटी आणि जकातीमधून राज्याला सध्या १४,५०० कोटींचा महसूल मिळतो. जर, हे कर रद्द करायचे झाल्यास त्यावर पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा लागेल. २०१६ सालापासून राज्यात जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा केंद्राचा विचार सुरू आहे. त्यामुळे जीएसटी लागू झाल्याशिवाय एलबीटी रद्द करता येणार नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जीएसटीच्या माध्यमातून ८ हजार कोटी जमा करणे शक्य झाल्यास केंद्राकडून उर्वरित ६,५०० कोटी आम्हाला मिळतील. यातून सध्या राज्याला एलबीटी आणि जकात करातून येणाऱया महसूलाच्या आकडेवारीशी बरोबरी साधता येईल आणि हे दोन्ही कर रद्द करता येतील. त्याशिवाय एलबीटीला पर्याय म्हणून सध्या आपल्याकडे दोनच पर्याय आहेत. एकतर आपल्याला कर वसुलीत वाढ करावी लागेल किंवा राज्यात जीएसटी लागू होईपर्यंत वाट बघावी लागेल.”
राज्याची सध्याची आर्थिक स्थिती पाहून एलबीटी आणि जकात कर रद्द करण्यामागच्या तांत्रिक अडचणींची सविस्तर माहिती व्यापारी संघटनांना देणार असून राज्यात जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी रद्द करता येणार नाही याबाबत व्यापारी संघटनांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही फडणवीस पुढे म्हणाले.