28.5 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
26

तिरोडा,दि.10 : तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूरांचे प्रश्न संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या विविध मागण्या आणि समस्या यावर उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून तालुकास्तरावरील समस्यांचे निवेदन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्याकरिता देण्यात आले.

तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात राकाँ तालुका अध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन, पं.स.सभापती उषा किंदरले, उपसभापती डॉ.किशोर पारधी, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, विणा पंचम बिसेन, प्रिती संजय रामटेके, सुनीता मडावी, पं.स.सदस्य मनोहर राऊत, प्रदीप मेश्राम, निता रहांगडाले, माया शरणागत, जया धावडे, संध्या गजभिये आणि राकाँ महासचिव जागेश्वर निमजे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

शिष्टमंडळाने भेट घेतले त्यावेळी उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह तहसीलदार रविंद्र चव्हाण, खंडविकास अधिकारी हिरामण मानकर, नगर पालिकेचे मुख्याधिकारी, नायब तहसीलदार आणि विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती. माजी आमदार बन्सोड यांनी निवेदनातील विविध १३ मागण्यांवर विस्तृत चर्चा घडवून आणली. त्यात प्रामुख्याने नोटाबंदीमुळे शेतकरी, शेतमजूर, दुकानदार, फळ, भाजी विक्रेते यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. त्याकरिता बँकेत लावलेली बंधने तोडून काढावी, जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची असल्याने या बँकेला जुन्या नोटा घेण्याची परवानगी देण्यात यावी.

शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी काही उपायही सुचविले. काही मुद्यांवर स्थानिक कार्यालयात येणाऱ्या अडचणींवर जि.प. सदस्य सुनीता मडावी, मनोज डोंगरे, पंचम बिसेन, प्रेमकुमार रहांगडाले, ग्यानीराम डोंगरवार यांनी प्रकाश घातला.

यावेळी उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांनी अदानी, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून स्वतंत्र बैठक घेऊ व त्यात आपल्याला बोलावू, जिल्हाधिकारीमार्फत अडलेल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात येतील, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

खंडविकास अधिकारी हिरामण मानकर यांनी मजुरांना ५० दिवस कामे निश्चित देण्यात येतील, लवकरच कामे सुरु केले जातील असे आश्वासन दिले. तहसीलदार रविंद्र चव्हाण यांनी तालुकास्तरावरील समस्या सोडविल्या जातील असे आश्वासन दिले. ग्रामीण कार्यकर्त्यामध्ये उपाध्यक्ष जगनलाल धुर्वे, धनराज पारधी, मुकेश बरियेकर, बबलदास रामटेके, खुशाल शहारे, शिवदास पारधी, सुखराम उके, ग्यानीराम ठोंबरे, तिरुपती राणे यांच्यासह १५० कार्यकर्ते उपस्थित होते.