मुंबई दि.१- ‘सनातन संस्थेचे विचार घातक आहेत. या संस्थेकडून मानवी बॉम्ब तयार केले जात आहेत. त्यासाठी शस्त्र म्हणून संमोहनाचा वापर केला जात आहे. हे असेच चालले आणि या संस्थेवर बंदी आणली नाही तर भारताचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही”, अशी भीती अखिल भारतीय अंधश्रद्धा निमुर्लन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी व्यक्त केली. येथे आज (गुरुवार) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मानव पुढे म्हणाले, ”माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणात समीर गायकवाडला पकडले गेले. ही कारवाई फडणवीस यांना सांगूनच केली गेली”, असे ते म्हणाले.
”1989 मध्ये सनातनचे संस्थापक डॉ. जे. बी. आठवले यांनी आपल्यावरही संमोहनाचा प्रयोग केला. पण, कुणालाही त्याच्या इच्छेविरूद्ध संमोहित करता येत नाही. संमोहन तात्पुरते असते, एखादी गोष्ट वांरवांर सांगितली तर ब्रेन वाशिंग होते. बेन वॉशिंग वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. संमोहनाच्या माध्यमातून अधिक परिणामकारक बेन वॉशिंग केले जाते आणि हेच सनातन ही संस्था दहशतवादी कृत्यासाठी करत आहे”, असे मानव म्हणाले.