11 महिन्यात 78 पत्रकारांवर हल्ले 

0
13

गोंदिया दि. २१: एकीकडे महाराष्ट्रात पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा कऱण्यास दिरंगाई होत असतानाच दुसरीकडे पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यात कित्येक पटीनं वाढ झाल्याचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून दिसून येत असल्याची माहिती कृती समितीचे प्रमुख एस.एम.देशमुख यांनी दिली आहे. येते.1 जानेवारी 2015 पासून आज 21 नोव्हेंबर 2015 या कालावधीत राज्यात 78 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.पुर्वी पाच-सहा दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत होता आता हे प्रमाण चार दिवसाला एका पत्रकारावर ह्ल्ला इथ पर्यत घसरले आहे.देशातील असहिष्णू वातावरणाचा हा परिपाक आहे काय ? हे आम्हाला माहिती नाही पण हल्ले वाढलेत हे वास्तव आहे.त्यातच आज नाशिक येथे सकाळच्या पत्रकारावर पोलीस उपायुक्तांनी केलेल्या हल्याचा निषेध नोंदवित सरकारने आत्ता तरी पत्रकार संरक्षण कायदा तयार करावे असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

या शिवाय धमक्या देणे,खोटे गुन्हे दाखल करणे,असे प्रकार राजरोस सुरू आहेत.खोटे गुन्हे दाखल करण्याचेही तीसच्या आसपास प्रकरणं समितीकडे आलेली आहेत.जीवे मारण्याच्या धमक्या तर दररोज दिल्या जातात आणि आता ते पत्रकारांच्याही अंगवळणी पडल्यासारखे झाले आहे.महाराष्ट्रात पत्रकारांवर होत असलेले हल्ले अन्य कोणत्याही राज्याच्या तुलनेत अधिक आहेत हे आकडेवारीवरून दिसते.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे तारीखवार आणि नावासह तसेच हल्ल्याच्या कारणांसह ही आकडेवारी उपलव्ध असल्याने सरकारही त्याचा इन्कार करू शकत नाही.पत्रकार संरक्षण कायदा हाच यावरचा एकमेव प्रभावी उपाय असल्याचे समितीचे म्हणणे असून त्यासाठी समिती गेली पाच वर्षे लढा देत आहे.परवा समितीने गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची भेट घेतली तेव्हा मसुदा तयार असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी त्याचे कायद्यात रूपांतर कधी होणार हे ठोसपणे कोणी सांगत नाही.
आज नाशिकमध्ये महेंद्र महाजन या पत्रकाराला पोलिसांनी बेदम मारहाण केली.त्याचा निषेध केला तर काही पत्रकारांनी निषेध किती दिवस करीत राहणार ? असा रास्त प्रश्‍न विचारला आहे.खरं तर जे पत्रकार असा प्रश्‍न विचारतात तेच पत्रकारांच्या लढ्यापासून स्वतःला दूर ठेवत असल्याने असे प्रश्‍न विचारण्याची वेळ त्यांच्यावर येते.आपला पांढरपेशी स्वभाव बाजूला ठेऊन सर्व पत्रकार एकत्र आले तर असा प्रश्‍न विचारण्याची वेळ कोणावरही येणार नाही हे तेवढंच खरं.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती मात्र कायदा होईपर्यंत आपला लढा चालूच ठेवणार असल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे.