मुंबई : राज्यातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनाचे सध्याचे प्रमाण २० टक्क्यांहून ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याकरिता ‘हरित महाराष्ट्र’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. दि. १ जुलै, २०१६ रोजी ‘कृषी दिन व ‘वन महोत्सवाचे’ औचित्य साधून एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
जागतिक वन दिनाचे औचित्य साधून वनमंत्र्यांच्या हस्ते वनविभागांतर्गत करण्यात येत असलेल्या विविध कामांच्या यशोगाथांचे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, वन विभागाचे सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.
वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सामाजिक वनीकरण विभाग, ठाणे यांच्या यशोगाथेसह खानापूर, शिरोता, पौड वनपरिक्षेत्रात करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाच्या यशोगाथेचे प्रकाशन केले. वाघ डोंगरी निसर्ग पर्यटन योजना, सासवडचा माहितीपट याचेही प्रकाशन झाले.