रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी ७ मे रोजी मतदान

0
2
रायगड दि 18- भारत निवडणूक आयोगाने  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48  लोकसभा मतदारसंघ असून 32 रायगड लोकसभा मतदार संघासाठी तिसऱ्या टप्प्यात दि 7 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 12 एप्रिल पासून सुरु होईल. जिल्ह्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला जाणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा रायगड लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
32- रायगड लोकसभा मतदार संघाची तिसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे.
 शुक्रवार 12 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे.
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल आहे.
 नामनिर्देशन पत्राची छाननी 20 एप्रिल रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल आहे.
मतदान 7 मे होणार असून मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी 6 जून पर्यंत आहे.
 रायगड जिल्ह्यात एकूण 2 हजार 694 मतदान केंद्र असून रायगड लोकसभा मतदार संघत 2 हजार 185 मतदान केंद्र आहेत. निवडणूक कामासाठी पुरेसे मनुष्यबळ जिल्ह्यात उपलब्ध आहे. एकूण 27 हजार कर्मचारी असून प्रत्यक्ष कामकाजसाठी 13 हजार 470 मनुष्यबळ आवश्यक आहे.
मतदार संघाचे एकूण मतदार
रायगड लोकसभा मतदार संघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, हे रायगड जिल्ह्यातील तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर हे लोकसभा मतदार संघ आहेत.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, आणि उरण हे विधानसभा मतदार संघ 33- मावळ लोकसभा मतदार संघात आहेत.
रायगड मतदार संघात एकूण 16 लाख 53 हजार 935 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 8लाख 13 हजार 515 मतदार तर महिला 8 लाख 40 हजार 416 मतदार तर तृतीय पंथी 4 आहेत. तर दिव्यांग 8 हजार 46 तर 18 -19 वयोगटातील 16हजार 288 मतदार आहेत. तर 85 पेक्षा अधिक वयोगटातील 31 हजार 28 मतदार आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी विविध ॲप; तक्रार करण्यासाठी स्वतंत्र ॲप 
या निवडणुकीत cVIGIL ॲपचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही सामान्य नागरिकाला जर निवडणुकीत काही अफरातफर दिसून आली तर या ॲपवर जाऊन त्याची माहिती द्यायची आहे. फोटो अपलोड करण्याचीही सुविधा आहे. ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे त्याच्या लोकेशनवरून निवडणूक आयोगा सदर परिसराचा माग काढेल आणि १०० मिनिटांच्या आत आयोगाचे पथक त्याठिकाणी दाखल होईल.
मतदारसंघातील उमेदवारांची माहिती मिळवायची असेल तर मतदारांना Know Your Candidate (KYC-ECI) या ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राजकीय जाहिरातींच्या प्रसारण पूर्व प्रमाणीकरणासाठी सर्व संबंधित राजकीय पक्ष ‘माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडे संपर्क करतील. त्यानुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.
निवडणुकीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज
स्वतंत्र आणि निशपक्ष निवडणूक घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. निवडणुक कर्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 22 समित्या नेमण्यात आल्या आहेत. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश करण्यात येणार आहे.
काय करावे, काय करू नये
निवडणूका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी “काय करावे” आणि “काय करु नये” याबाबतची अंमलात आणावयाची तत्वे :
*काय करावे*
(१) निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आलेले कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील.
(२) पूर, अवर्षण, रोगाची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांतील जनतेसाठी पिडानिवारण आणि पुनर्वसन कार्य सुरु करता व चालू ठेवता येऊ शकेल.
(३) मरणासन्न किंववा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुविधा देणे चालू ठेवता येऊ शकेल.
(४) मैदानांसारखी सार्वजनिक ठिकाणे निवडणूक सभा घेण्यासाठी सर्व पक्षांना / निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निःपक्षपातीपणे उपलब्ध झाली पाहिजे. त्याचप्रमाणे हेलिपॅडचा वापरही सर्व पक्षांना / निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निःपक्षपातीपणे करता आला पाहिजे.
(५) इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका, त्यांची धोरणे, कार्यक्रम पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी.
(६) शांततापूर्ण आणि उपद्रवरहित गृहस्थजीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार पूर्णपणे जतन करण्यात यावा.
(७) स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.
(८) प्रस्तावित सभेच्या जागी कोणतेही निबंधक किंवा प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्याचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास याबाबत सूट मिळण्याकरीता अर्ज केला पाहिजे आणि अशी सूट वेळीच मिळवावी.
(९) प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धकाचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी मिळवावी
.(१०) समांमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अन्यथा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी.
(११) मिरवणूक सुरु होण्याची वेळ आणि जागा, ती जेथून जाणार असेल तो मार्ग आणि ती जेथे संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदर निश्चित करण्यात येईल आणि पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी.
(१२) मिरवणूक जेथून जाणार असेल त्या भागांमध्ये कोणताही निर्बंधक आदेश जारी असल्यास, त्याबाबत खात्री करुन घेऊन, त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतूक विनियम आणि इतर निर्बंध यांचेही अनुपालन करण्यात यावे.
(१३) मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ देऊ नये.
(१४) मतदान शांततापूर्ण आणि सुनियोजितरीतीने पार पडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करावे.
(१५) सर्व कार्यकर्त्यांनी बिल्ले व ओळखपत्र ठळकपणे लावावीत.
(१६) मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्ठया साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नांव किवा पक्षाचे नांव असू नये.
(१७) प्रचाराच्या कालावधीमध्ये व मतदानाच्या दिवशी वाहने चालविण्यावरील निर्बंधांचे पूर्णतः पालन करण्यात यावे.
(१८) मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक / मतदान प्रतिनिधी यांव्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच कोणत्याही मतदान कक्षात प्रवेश करता येईल. इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, खासदार किंवा आमदार इत्यादी) तिला अटीतून सूट मिळणार नाही.
(१९) निवडणुका घेण्याविषयीची कोणतीही तक्रार किंवा समस्या, आयोग / निवडणूक निर्णय अधिकारी / क्षेत्र / प्रक्षेत्र दंडाधिकारी / भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात.
(२०) निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी / जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे निवडणूकीच्या विविध पैलूंशी संबंधित असलेल्या सर्व बाबींविषयचे निदेश / आदेश / सूचना यांचे पालन करण्यात यावे.
(२१) आपण एखाद्या मतदारसंघातील मतदार किंवा उमेदवार किंवा त्या उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी नसाल तर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आपण त्या मतदारसंघातून निघून जावे.
काय करु नये
(१) सत्ताधारी पक्ष / शासन यांनी केलेल्या कामगिरी विषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात काढण्यास प्रतिबंध आहे.
(२) कोणताही मंत्री उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार म्हणून आला असेल त्याशिवाय मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार
नाही.
(३) शासकीय कामाची निवडणूक मोहिम / निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करू नये.
(४) मतदाराला, पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये.
(५) मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करु नये.
(६) वेगवेगळ्या जाती, समूह किंवा धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढवील किंवा परस्पर द्वेष किंवा तणाव निर्माण करील अशी कोणतेही कृती करण्याचा प्रयत्न करु नये.
(७) इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करण्यात येऊ नये.
(८) इतर पक्ष किवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर, आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यस्त माहिती यांच्या आधारावर टिकाटिप्पणी करु नये.
(९) देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणतेही प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके, संगीत यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केली जाणार नाही.
(१०) मतदारांना लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी, मतदान केंद्रापासून १०० मीटर्सच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या ४८ तासात सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यासारख्या भ्रष्ट आणि निवडणूक अपराध समजल्या जाणाऱ्या गोष्टीना मनाई आहे
(११) लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने करणे किंवा धरणे धरणे यांचा कोणत्याही परिस्थितीत अवलंब केला जाणार नाही.
(१२) स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून, कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, वाहने इत्यादींच्या मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय ध्वजदंड उभारण्यासाठी, निशाण्या लावण्यासाठी, सूचना चिकटविण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही. (असे साहित्य आढळून आल्यास ते निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून त्यांच्याकडे जमा करावे) यामध्ये खाजगी व सार्वजनिक मालमत्ता या दोहोंचाही समावेश आहे.
(१३) इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करु नये.
(१४) ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेऊ नये.
(१५) मिरवणुकीतील लोकांनी, क्षेपणास्त्र किंवा शख म्हणून ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगू नयेत.
(१६) इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भित्तीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रुप करु नयेत.
(१७) मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठया वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाच्या जवळ भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करु नये.
(१८) ध्वनिवर्धकांचा सकाळी ६-०० पूर्वी किंवा रात्री १०-०० नंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय वापर करण्यात येऊ नये.
(१९) संबंधित प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणूका यांच्या मध्येही ध्वनिवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. सर्वसाधारणपणे अशा सभा / मिरवणुका रात्री १०-०० नंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ नये आणि त्याशिवाय त्याचा वापर स्थानिक कायदे, त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान आणि हवामानाची स्थिती, सणासुदींचा मोसम, परीक्षेचे दिवस इत्यादींसारख्या परिस्थितीच्या अधीन असेल.
(२०) निवडणुकीच्या काळात दारुचे वाटप केले जाणार नाही.
(२१) ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तीला सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अशी कोणतीही व्यक्ती, मतदानाच्या दिवशी, त्याच्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह मतदान केंद्र असलेल्या जागेच्या परिसरात (१०० मीटर्सच्या आत) प्रवेश करणार नाही. तसेच, अशी कोणतीही व्यक्ती, मतदानाच्या दिवशी, त्याच्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह मतदारसंघामध्ये फिरणार नाही. जर, सरकारी सुरक्षा पुरविलेली व्यक्ती, मतदार असेल तर, केवळ मतदान करण्यासाठी सोबत असलेल्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह त्याच्या / तिच्या ये-जा करण्यावर निर्बंध घालील.
(२२) ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरवली आहे किंवा त्या व्यक्तीकडे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत अशा कोणत्याही व्यक्तीची निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये.
टीप :- “काय करावे” किंवा “काय करु नये” यांची वरील सूची केवळ वानगीदाखल असून सर्वसमावेशक नाही. वरील विषयावरील इतर तपशीलवार आदेश, निदेश / सूचना यांना पर्यायी असणार नाही. त्यांचे काटेकोरपणे पालन करावेच लागेल. शंका असल्यास भारत निवडणूक आयोग / राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांचे मार्गदर्शन / मंजूरी घेणे आवश्यक आहे. आयोगाच्या वरील सूचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्याची दक्षता घ्यावी.