“गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आदिवासी पोलिसांच्या दहशतीत”

0
12

गडचिरोली,दि.९: जिल्ह्याच्या दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या शेकडो आदिवासींना पोलिसांनी मारहाण करुन तुरुंगात टाकले असून, हा समाज पोलिसांच्याच दहशतीत वावरत असल्याची टीका नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल दंडकारण्य स्पेशल झोनचा प्रवक्ता श्रीनिवास याने केला आहे.
श्रीनिवासने प्रसारमाध्यमांना पाठविलेल्या पत्रात पोलिसांनी महिनाभरात किती आदिवासींना मारहाण केली व किती जणांना तुरुंगात डांबले, याची एक यादीच जारी केली आहे. श्रीनिवासच्या म्हणण्यानुसार, गेल्या सहा महिन्यात उत्तर गडचिरोलीत १५५ व दक्षिण गडचिरोलीतील १५३, अशा ३०८ आदिवासींना बेदम मारहाण केली, तर ३२ आदिवासींना नक्षलवादी ठरवून कारागृहात डांबले आहे. शिवाय गेल्या सात वर्षांत ६० नक्षल्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोपही श्रीनिवासने केला आहे.
श्रीनिवास पत्रकात पुढे असे म्हणतो की, जल, जंगल व जमीन यावर संपूर्ण अधिकार असावेत, यासाठी आदिवासी जनता संघर्ष करीत आहे. मात्र, पोलिस त्यांना नक्षलसमर्थक ठरवून त्यांच्यावर अत्याचार करीत आहे. राज्य व केंद्रातील हिंदू कट्टरवादी सत्ताधाऱ्यांकडून हा अन्याय, अत्याचार सुरू असल्याचे श्रीनिवासने म्हटले आहे. नक्षलवाद व माओवादाच्या नावावर अतिदुर्गम भागातील आदिवासींना अंगावरचे कपडे काढून, त्यांच्या डोळयात तिखट टाकून पोलिसांकडून काही जणांना मारहाण झाली. ऑपरेशन ग्रीन हंट अंतर्गत ‘नक्षलमुक्त जिल्हा’ या नावावर आदिवासींवर अन्याय करण्यात येत आहे. येथील आदिवासींनी सुरजागड व दमकोंडी क्षेत्रातील लोह उद्योगांना विरोध करून ‘जान देंगे पर पहाड नही देंगे’ हा नारा देत आंदोलन सुरू केले आहे. परंतु गडचिरोली पोलिस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करुन आदिवासींवर अत्याचार करीत असल्याचा आरोप श्रीनिवासने केला आहे.
गडचिरोली पोलिस दलाने जानेवारी २०१६ ते जून २०१६ दरम्यान ३०८ आदिवासींना बेदम मारहाण केली. उत्तर गडचिरोलीतील १५५, तर दक्षिण गडचिरोलीच्या १५३ आदिवासींना बेदम मारहाण केल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे, हे श्रीनिवासने मारहाण झालेल्यांची नावे, त्यांचे गाव व तारखेसह सांगितले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ३२ आदिवासींना नक्षलवादी ठरवून कारागृहात डांबण्यात आले. यातील १७ जण चंद्रपूरच्या कारागृहात, ८ जण नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात, तर ४ जण कांकेर, ३ जण दुर्ग व दोघांना भंडारा कारागृहात ठेवण्यात आलेले आहे. गेल्या सात वर्षांत पोलिसांनी ६० नक्षल्यांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप श्रीनिवासने केला आहे.

महाराष्ट्र-तेलंगणा व महाराष्ट्र-छत्तीसगड पोलिस दलाने संयुक्त अभियान राबवून कांकेर, कारका, कुडकेली, हुर्रेकसा, काटेपल्ली इत्यादी ठिकाणी बनावट चकमकी घडवून अनेकांच्या हत्या घडवून आणल्या. गडचिरोलीचे तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेश रेड्डी यांनी भित्रेपणाने काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली कमांडो पोलिसांनी या परिसरातील अनेक घरांना आगी लावल्या. हुर्रेकसा येथील घटनेत कॉ. राहुल हा पोलिसांना धुळ चारून निघून गेला. मात्र, कॉ. रजिता हिने पोलिसांशी लढतांना कुर्बानी दिली, असाही उल्लेख श्रीनिवासने केला आहे. गडचिरोली पोलिसांनी कॉ. दिनकरच्या भावाला बडा झेलिया गावात जाऊन सर्वांसमक्ष मारहाण केली. तसेच त्याच्या घरात घुसून जेवणाचे ताट, पिण्याचे पाणी फेकून दिले, तसेच कुऱ्हाड, फावडे, नांगर व इतर साहित्याची नासधूस केली, असेही श्रीनिवासने म्हटले असून, स्थानिक आदिवासींनी पोलिसांच्या या मारहाणीविरुध्द लढा पुकारण्याचे आवाहनही त्याने केले आहे.