मुंबई,दि.19 मे :- महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांकडून मागणी एवढी वीज उपलब्ध होत असल्याने दि. 07.05.2017 पासून राज्यामध्ये कुठेही भारनियमन करावे लागत नाही. दि. 20.05.2017 च्या शुन्य प्रहारापासून कृषिपंपांनासुध्दा पूर्ववत रात्री 10 तास किंवा दिवसा 8 तास चक्राकार पध्दतीने 3 फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.विजेची उपलब्धता आणि मागणी याचा ताळमेळ घालण्यासाठी महावितरणने मे महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस वितरण व वाणिज्यिक हानी जास्त असलेल्या म्हणजे जी-3, जी-2, जी-1 एफ आणि ई अशा गटामध्ये गरजेनुसार आणीबाणीच्या परिस्थितीत भारनियमन केले होते. यातही अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे कमी वितरण व वाणिज्यिक हानी असलेल्या गटांच्या वाहिन्यांवर तसेच कृषी वाहिन्यांवर मर्यादित काळाकरिता भारनियमन करावे लागल होतेे. तसेच दि. 05.05.2017 पासून कृषिपंपांच्या वेळेमध्ये व उलब्धतेमध्ये बदल करून 8 तास वीजपुरवठा करण्यात येत होता.
वीज उपलब्धतेत वाढ करण्यासाठी मा. मंत्री (ऊर्जा) व महाराष्ट्र शासन यांनी मा. मंत्री (कोळसा), भारत सरकार यांना विनंती करून कोळशाच्या उपलब्धतेमध्ये वाढ करून घेतली आहे. तसेच महावितरणने करार केलेले सर्व वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत, द्विपक्षीय कराराद्वारे 500 मे.वॅ. वीज उपलब्ध करून घाटघर विद्युत निर्मिती केंद्राचा प्रभावी वापर आणि आवश्यक त्या काही तासांसाठी पॉवर एक्सचेंजमधून 300 ते 1,800 मे.वॅ. पर्यन्त वीज खरेदी करून विजेची तूट भरून काढली आहे. माहे एप्रिल व मे 2017 या महिन्यात कमाल मागणी 19 हजार ते 19 हजार 600 मे.वॅ. एवढी नोंदविली गेली होती.वरील उपाययोजनेमुळे दि. 07.05.2017 पासून राज्यामध्ये कुठेही भारनियमन करावे लागले नाही. त्यामुळे दि. 20.05.2017 च्या शुन्य प्रहारापासून कृषिपंपांनासुध्दा पूर्ववत रात्री 10 तास किंवा दिवसा 8 तास चक्राकार पध्दतीने 3 फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.