एका एकरासाठी 50 लाख रुपये, समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे दर जाहीर

0
26

नाशिक,दि.07 : समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सरकारने दर जाहीर केले आहेत. जीरायती जमिनीला सरासरी एकरी 50 लाख रुपये दर मिळणार आहे. किमान 40 लाख रुपये ते 85 लाख रुपये एकरी भाव असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली आहे.आदिवासी शेतकऱ्यांना बागायतीसाठी दीड पट दर दिले जातील. तर फळझाडे मालमत्तेला दुप्पट रक्कम मोबदला मिळणार आहे. शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन बी. राधाकृष्णन यांनी केले आहे.सरकारच्या या निर्णयामुळे 48 गावातील शेतकरी लखपती होणार आहेत. इगतपुरीतील पिंपरी सदो आणि सिन्नरमधील सावता माळी नगर पांढूरलीला सर्वाधिक 80 लाखापर्यंतचा भाव देण्यात येणार आहे.जमिनीची खरेदी करताच दोन दिवसात रक्कम आरटीजीएसद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.सरकारने एकरी 50 लाखांपर्यंतचे दर जाहीर केले असले तरी शिवडे गावातील अनेक शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध मात्र कायम आहे. आम्हाला 2 कोटी रुपये एकरी दिले तरी आम्ही जमीन सोडणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सरकारकडून सुरु आहेत.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून मोजणी सुरु केल्याने रोष व्यक्त केला जात आहे. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारने भूमीसंपादन करण्यास सुरुवात केली आहे. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

  • जमीन
    एकूण वन जमीन 399 हेक्टर
    एकूण शेत जमीन 17499 हेक्टर
    पडीक जमीन 2922 हेक्टर
    एकूण जमीन 20820 हेक्टर
  • खर्च 
    बांधकाम 24 हजार कोटी
    आर्थिक अधिभार 6 हजार कोटी
    भूसंपादन 13 हजार कोटी
    इतर 3 हजार कोटी
    एकूण खर्च 46 हजार कोटी