महाराष्ट्र विधिमंडळाचे 26 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

0
9

राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला;अधिवेशन 28 मार्चपर्यंत

मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ते 28 मार्चपर्यंत चालणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात येणार आहे, असा निर्णय आज झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात झाली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती माणिकराव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते.विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी यावेळी कामकाजासंबंधी माहिती दिली.अर्थसंकल्पीय अधिवेशन हे एकूण 35 दिवसाचे असणार असून 22 दिवस कामकाज चालणार आहे. 26 फेब्रुवारी 2018 रोजी राज्यपाल महोदयांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल तर राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च 2018
रोजी दुपारी 2 वाजता सादर करण्यात येईल. या अधिवेशनात विधानसभेत 1 विधेयक प्रलंबित तर विधानपरिषदेत 4 विधेयके प्रलंबित आहेत. याशिवाय 4अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहेत तर त्याचबरोबर 4 प्रस्तावित अध्यादेश आणि 6 प्रस्तावित विधेयकेही मांडण्यात येणार आहेत.

विधानमंडळात साजरा होणार ‘मराठी भाषा गौरव दिन’

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कवी वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी रोजी असणारा जन्मदिन हा राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळात ‘मराठी भाषा गौरव दिन’साजरा करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.यादिवशी सुरेश भट यानी लिहिलेली ‘मायबोली’ ही कविता अधिवेशनाच्या सुरुवातीला म्हणण्यात येईल. तसेच या दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारार्थींना विधिमंडळाच्या गॅलरीत बसवून त्यांचे अभिनंदन करण्यात येईल.या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस शिक्षणमंत्री विनोद तावडे, संसदीय
कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे, विधान परिषद सदस्य सुनील तटकरे, हेमंत टकले, अनिल परब, शरद रणपिसे, विजय ऊर्फ भाई गिरकर, डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा सदस्य गणपतराव देशमुख, अजित पवार, जयंत पाटील, राज पुरोहित आदी उपस्थित होते.