मराठवाडा, विदर्भातील लोहमार्गांसाठी नवी कंपनी

0
6

मुंबई – महाराष्ट्रातील अविकसित भागातील लोहमार्गाचा विस्तार तसेच नवे लोहमार्ग टाकण्यासाठी रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र सरकार यांच्यात करार होणार आहे. त्यानुसार विदर्भ, मराठवाडा व कोकणातील रखडलेल्या मार्गांचे विस्तारीकरण व नवे मार्ग टाकण्यासाठी नवी कंपनी स्थापन करण्यात येणार अाहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी ही माहिती दिली.

प्रभू यांनी सांगितले, रेल्वेच्या नव्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंत्रालय महाराष्ट्र सरकारच्या मदतीने नवी कंपनी स्थापन करणार आहे. कंपनीचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरते मर्यादित राहील. राज्यातील विदर्भ, मराठवाडा व कोकणातील प्रलंबित लोहमार्ग, नवे लोहमार्ग व विस्तारीकरण करणे हे या कंपनीचे मुख्य काम राहील. यामुळे राज्यातील लोहमार्गाचे जाळे विकसित होऊन मागास भागाचा विकास साधण्यास मदत होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. यामुळे राज्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असे ते म्हणाले. दिघी बंदर आणि रेल्वे विकास महामंडळात हा करार झाल्यानंतर पत्रपरिषदेत रेल्वेमंत्र्यांनी ही माहिती दिली.

सुरेश प्रभू यांनी सुचवलेले मार्ग
– नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नवे लोहमार्ग टाकणे
– कोल्हापूर ते वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) नवा लोहमार्ग टाकणे
– कराड (जि. सातारा) ते चिपळूण नवा लोहमार्ग टाकणे

मराठवाड्याला काय हवे‌?
– मनमाड -परभणी दुहेरीकरण.
– रोटेगाव-पुणतांबा हा सर्वेक्षण पूर्ण झालेला मार्ग
– मराठवाड्याच्या विकासात दुहेरीकरणाचा प्रलंबित पडलेला प्रश्न विकासास मोठी बाधा ठरला आहे.