NCP चा CM ना इशारा; शेतक-यांना मदत करा अन्यथा आंदोलन

0
9

मुंबई दि. २ – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने आज सकाळी 10 च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबादसह लातूर या पाच जिल्ह्यांत भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. पाच जिल्ह्यांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारीच चिंताजनक आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतक-यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे या शिष्टमंडळाने केली. 15 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास जनआंदोलन करू असा इशारा या बैठकीनंतर अजित पवार यांनी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र सरकार शेतक-यांच्या मदतीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांच्यासमावेत पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे, मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार व काही स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.
माजी केंद्रीय कृषी मंत्री राहिलेले शरद पवार ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. पवारांनी मागील तीन दिवस विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींसमवेत मराठवाड्यातील दुष्काळाचा पाहणी दौरा केला. पवारांनी औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्याला भेटी दिल्या व दुष्काळाची परिस्थिती समजून घेतली. पवारांनी या दौ-यादरम्यान शेतक-यांशी संवाद साधला. यात काही मुद्दे पुढे आले. हेच मुद्दे घेऊन शरद पवार पुतण्या अजित पवार व धनंजय मुंडेंना घेऊन फडणवीस यांच्याकडे गेले व मराठवाड्यातील शेतक-यांना मदतीची गरज असल्याचे सांगितले.
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारीच चिंताजनक आहे. दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करताना राजकीय लाभ घेण्याचा विचार कुणी करता कामा नये. राज्य सरकार असो वा केंद्र सरकार, दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सहकार्याचीच राहील. मराठवाड्यातील जवळपास बहुतांश शेतकरी थकबाकीदार आहेत. केंद्रात आमच्या हाती सत्ता असताना आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. या वेळी सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी आम्ही करत नाही, पण सरकारने या पाच जिल्ह्यांत जो शेतकरी कर्जबाजारी होऊन संकटात आला आहे, त्याचे कर्ज माफ करावे. ही कर्जमाफी केली तरच यानंतर खरिपामध्ये शेतकरी पेरणी करू शकेल, असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
दुष्काळाच्या भयंकर परिस्थितीवर मात करण्यासाठी राजकारण न करता सगळ्यांनी मिळून या संकटाचा सामना करूया असे या भेटीदरम्यान पवार- फडणवीस यांच्यात चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनीही संकटातील शेतक-यांना मदत करण्यास आमचे सरकार अखडता हात घेणार नाही असे आश्वासन दिले