गळती रोखून शासकीय महसूल वाढवा- एकनाथराव खडसे

0
12

पुणे दि. १५: गळती रोखून शासकीय महसुलात वाढ करण्यासाठी अभिनव उपक्रम राबवा, असे आवाहन महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.महसूल विभागाच्या राजस्व परिषदेस सोमवारी येथील यशदाच्या एमडीसी सभागृहात प्रारंभ झाला. त्यावेळी श्री. खडसे बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, यशदाचे महासंचालक आनंद लिमये आदी उपस्थित होते.
श्री. खडसे म्हणाले, महसूल विभाग अतिशय जुना विभाग आहे. सामान्यांच्या जीवनाशी निगडीत असा विभाग आहे. पण सामान्यांच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी आवश्यक असणारा निधी उभारण्याचे कामही महसूल विभागाला करावे लागते. महसूल विभागाने महसुलाची चुकवेगिरी करणाऱ्यांना आळा घालून त्याचबरोबर नवनवीन उपक्रम राबवून महसुलाची वाढ केली पाहिजे.
महसूलविषयक अनेक कायदे जुने आहेत. त्यातील काही कायदे आणि तरतुदी कालबाह्य झाल्या आहेत. त्यामध्ये कालसुसंगत, असे बदल करण्याची आवश्यकता आहे. ते बदल शासकीय स्तरावर केले जात आहेत. वाढत्या शहरीकरणामुळेही महसूलविषयक बाबींमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतीत आवश्यक ते बदल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. जेथे कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे तेथे ते बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही श्री. खडसे यांनी स्पष्ट केले.
महसूल विभागाने गतिमान आणि पारदर्शी पद्धतीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून श्री. खडसे म्हणाले, विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी मिळून महसूल विभागाचा पंचवार्षिक आराखडा आखण्याची गरज आहे. लोकांच्या आशा आणि आकांक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या पूर्ण करण्याबरोबरच लोकांना विविध सेवा तातडीने कशा पद्धतीने देता येतील, याचा विचारही अधिकाऱ्यांनी करायला हवा.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी महसूल विभागाने कठोर कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर शासनाच्या ताब्यातील जमिनींचाही वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे. कारण भविष्यात लोकांना विविध सेवा देताना जमिनीची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासणार आहे, असेही श्री. खडसे यांनी सांगितले.
वाळू चोरी करणाऱ्यांवर एमपीडीए खाली कारवाई केली जाण्याचा शासन विचार करीत आहे. त्यासाठी कायद्यात दुरूस्ती केली जाणार आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकाबरोबरच ज्याच्या नावावर वाहने आहेत त्यांच्यावरही गुन्हा नोंद केला जावा, यासाठी कायद्यात दुरूस्ती केली जात आहे. करमणूक करात वाढ करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा, असेही श्री. खडसे यांनी सांगितले.
यावेळी श्री. श्रीवास्तव यांनी प्रास्ताविक केले. परिषदेस राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी श्री. खडसे आणि राज्यमंत्री श्री. राठोड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हवेलीच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल बर्गे यांनी सूत्रसंचालन केले.