वृत्तसंस्था
हैदराबाद दि.१७: – महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाचे स्वप्न बुधवारी आंध्रप्रदेशामध्ये साकार झाले असून, कृष्णा आणि गोदावरी या दोन नदींना एकमेकांशी जोडले गेले. यातून गोदावरी नदीच्या पोलावरम कालव्याच्या माध्यमातू 80 टीएमसी पाणी कृष्णेत सोडण्यात आले. यामुळे भविष्यातील पाण्याचे दुर्भिक्ष आणि मान्सून पावसाचे प्रमाण या दोन्हींचा ताळमेळ घालणे सोपे होणार आहे.
आंध्र प्रदेशमधून वाहणाऱ्या गोदावरी-कृष्णा, कृष्णा-पेन्नार, पेन्नार-तुंगभद्रा या चार मोठ्या नद्यांना एकमेकांसोबत जोडले जाणार आहे. या शिवाय देशभरातील 30 नद्यांना जोडण्याचे नियोजन आहे. आंध्र प्रदेशनंतर मध्य प्रदेशातील केन आणि उत्तर प्रदेशातील बेतवा नद्यांना जोडले जाणार आहे.
नॅशनल वॉटर ग्रिड प्लानमध्ये केन-बेतवा प्रोजेक्ट सर्वांत अग्रक्रमावर होता. मात्र, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी कृष्णा-गोदावरी प्रोजेक्टचे काम गतीने करून घेतले. परिणामी, केवळ आठच महिन्यात नदी जोडचे स्वप्न साकार झाले.
भारतात 200 वर्षांपूर्वी नदी जोड प्रकल्पाचा पहिला प्रयत्न झाला. ब्रिटिश इंजीनियर सर आर्थर काटन यांनी त्यावेळी आर्थर धोलाश्वेरमवरून वाहणारी गोदावरीला विजयवाडाच्या कृष्णा नदीसोबत जोडण्याचा प्रयत्न केला. पुढे स्वतंत्र भारतात प्रसिद्ध इंजीनियर के.एल. राव यांनी 1950 मध्ये नदी जोड प्रकल्पावर काम सुरू केले. अटल बिहारी वाजपेई जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर त्यात शिथिलता आली होती.