वृत्तसंस्था
हैदराबाद दि.२२ – विजयवाडा-गुंटूर विभागातील कृष्णा नदी किनारी ‘अमरावती’ शहराची आंध्रप्रदेशच्या नवीन राजधानीचे ठिकाण म्हणून निवड करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, गुरूवारी या राजधानीची कोनशिला ठेवत अधिकृत घोषणा करण्यात आली.सुमारे १८०० वर्षांपूर्वी सातवाहन राजांची राजधानी अमरावती हे शहर होते. आता या शहराला पुन्हा राजधानीची नवीन ओळख मिळणार आहे. विजया दशमीच्या मुहूर्तावर या राजधानीच्या कोनशिलेचा समारंभ सोहळा आयोजित करण्यात आल्याने. आज सकाळपासून नव्या अमरावतीध्ये राज्यातील मंत्रीसह जनतेची मोठ्या सख्येने उपस्थिती होते.
‘अमरावती’ असे नवीन राजधानीचे नाव गुंटूर जिह्यातील अमरेश्वर मंदिराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. अमरावतीला राजधानीचा दर्जा देण्याचा निर्णय या शहराचे ऐतिहासिक, पौराणिक महत्त्व लक्षात घेऊनच शासनाने घेतला. आज शहराच्या पुनर्बांधणीसाठी कोनशिला अनावरण समारंभाचे आयोजन केल्यामुळे नवीन अमरावती कशी असेल या संदर्भात लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
दिड वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरूवात केली. त्यांनी सुरूवातीला तेलगू भाषेत उपस्थितांना अभिवादन केले. मोदी म्हणाले, अमरावती आता राजधानी बनत आहे. सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी अत्यंत वेगवान काम केल्याने मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करीत आहे. शहरी विकासाची आज वेळेनुसार आवश्यकता आहे. त्यामुळे या विकासाकडे समस्येपेक्षा संधी म्हणून पाहायला पाहिजे असेही ते म्हणाले. त्यामुळेच भारत सरकारने १०० स्मार्ट सिटी बनवण्याचा प्रकल्प हाती घेतला, या बाबीचाही त्यांनी उल्लेख केला. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्याची नवी राजधानी ही अत्याधुनिक अशी राहणार असून देशातील सर्व राजधानी शहरापेक्षा एकवेगळे हायटेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज राहणार असल्याचे सांगितले.यावेळी केंद्रीय ग्रामीणविकास मंत्री व्यैकया नायडू हे देखील उपस्थित होते.